सातारा(प्रतिनिधी) – प्रशासन व पदाधिकारी यांनी कोणत्याही राष्ट्रीय आपत्तीचा एकत्रितपणे मुकाबला करायचा असतो. मात्र, सातारा पालिकेत नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या किरकोळ कारणावरून विसंवादाचे खटके उडू लागले आहेत. रोजच्या कामाचा अहवाल नगराध्यक्षांना देण्यास मुख्याधिकाऱ्यांनी असमर्थता दर्शवल्याने प्रशासनातील अंर्तगत हेवेदावे समोर आले आहेत.
करोना संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात शहर असताना रोजचे नवे आदेश आणि रोजच संशयित नागरिकांची तपासणी, शहराची स्वच्छता, जंतुनाशक फवारणी आदी महत्वाच्या कामांसाठी स्वतंत्रपणे नियोजन केले जात आहे. याशिवाय गरजू व दानशूर व्यक्तींकडून मदत मिळवून त्यांचे अन्नधान्य कीट बनवणे व त्याचे वाटप करणे हीसुध्दा जवाबदारी पालिकेने पार पाडली. मात्र प्रशासन नक्की कीट वाटप कस आणि कोणाला करतयं, यावर पालिका प्रशासन व पदाधिकारी यांच्यात बरेच वाद झाले. पालिका हद्दीतल्या लोकांना कीट वाटप का झाले नाही, झाले तर किती लोकांना, यावरून मुख्याधिकारी शंकर गोरे व पदाधिकाऱ्यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.
नगराध्यक्ष माधवी कदम यांनी बोलावलेल्या पहिल्या बैठकीला मुख्याधिकारी फिरकलेच नाहीत. मला भरपूर कामे आहेत असे सांगून आस्थापना विभागात ते बसून राहिले. दुसऱ्या बैठकीत मुख्याधिकाऱ्यांना नोटीस बजावून बोलावण्यात आले. तेव्हा तुमच्या राजकारणात मला स्वारस्य नाही आणि नगराध्यक्षांना मी अहवाल देणं बंधनकारक नाही, असे उत्तर मुख्याधिकाऱ्यांनी दिल्याने पदाधिकारी अवाक झाले.
नगराध्यक्ष या सातारा शहराच्या या प्रथम नागरिक असून पालिकेच्या रोजच्या कामाचा अहवाल नगराध्यक्षांना देण्यावरून प्रशासनाची चालढकल सुरू झाली आहे. मुख्याधिकाऱ्यांनी नगराध्यक्षांना रोजच्या कामाची व झालेल्या निर्णयाची कल्पना देण्याचा संकेत आहे. हा संकेत मुख्याधिकाऱ्यांकडून सर्रासपणे पायदळी तुडवला जात आहे. नगराध्यक्षांना अहवाल सादर करण्याची जवाबदारी मुख्य अभियंता भाऊसाहेब पाटील यांना सोपवण्यात आली होती. मात्र, एकच दिवस कामाच्या अहवालाची प्रत देण्याचा फार्स झाला. नंतर पुन्हा बांधकाम विभागाने नगराध्यक्षांप्रती जो प्रोटोकॉल पाळायचा त्याकडे दुर्लक्ष केले. सातारा विकास आघाडीच्या गटबाजीच्या राजकारणात एका गटाने नगराध्यक्षांची कोंडी करण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. आत्तासुद्धा करोनाच्या महामारीमध्ये नगराध्यक्षांना काहीच कळू द्यायचे नाही हे सुप्त राजकारण सातत्याने घडवले जात आहे. म्हणूनच मुख्याधिकाऱ्यांनीही आपली आघाडी स्वतंत्र ठेवली आहे.
महिला नगराध्यक्षांप्रति सौजन्य तरी दाखवा
साताऱ्याच्या नगराध्यक्षा माधवी कदम गेली साडेतीन वर्ष सत्तेत आहेत. प्रशासनाने महिला नगराध्यक्षांविषयी आदर ठेवलाच पाहिजे. नगराध्यक्षांना स्वतः फोन करून पालिकेत सुरु असलेल्या कामाची माहिती घ्यावी लागत आहे. नगराध्यक्षांना असौजन्याने उत्तर देणारे मुख्याधिकारी प्रत्यक्षात किती काम करतात व किती कागदी घोडे नाचवतात याची संपूर्ण साताऱ्याला कल्पना आहे. मुख्याधिकारी एक टक्क्याच्या राजकारणात माहिर आहेत, असा पालिका कर्मचाऱ्यांचा आरोप आहे आणि तो आरोग्य विभागाने पद्धतशीरपणे सिध्द केला आहे. त्यामुळे फार कामाची टिमकी न वाजवता मुख्याधिकाऱ्यांनी महिला नगराध्यक्षांप्रती सौजन्य दाखवावे, अशी सातारकरांची अपेक्षा आहे.