झुणकाभाकरफेम समतानंद, पत्रकार, लेखक, नाटककार व समाजसुधारक अनंत हरी गद्रे यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म देवरुख येथे 16 ऑक्टोबर 1890 रोजी झाला. शिक्षणासाठी ते पुण्यात आले. त्यांचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल व फर्गसन महाविद्यालयात झाले. राम गणेश गडकरी व श्री. म. माटे हे त्यांचे सहाध्यायी होते.त्यांनी अध्यात्माच्या ओढीने हिमालयाची भटकंतीही केली. स्वामी विवेकानंदांसारखे सिद्ध पुरुष त्यांना आदर्शस्थानी होते. कीर्तनकलेच्याच माध्यमातून अशा पुरुषांची आख्याने लावून त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याचा प्रयोगही त्यांनी करून पाहिला.
100 वर्षांपूर्वी संगीत नाटकांचा बोलबाला होता. साधारण 1930चे दशकात 2/3 तासांचे चित्रपट येऊ लागले. त्यामुळे रात्र जागविणारे नाट्यप्रयोगांना लोक कंटाळू लागले. संगीत नाटके बघणारा वर्ग मोठा असला तरी उपशास्त्रीय नाट्य संगीताची जाण असल्यासच बघणारास मजा येत असे. औद्योगिक क्रांतीमुळे माणसास वेळाचे महत्त्व पटू लागले होते. त्यामुळे करमणुकीसाठी जास्त वेळ घालविणे तत्कालीन नवीन पिढीला जिकिरीचे होऊ लागले. त्यामुळे 4/5 तास रात्रभर चालणारी रंगभूमी अडचणीत येऊ लागली. मात्र, यावर गद्रे यांनी नाटिका स्वरूप 2/3 तासांची नाटके आणण्याचा प्रथम प्रयत्न केला. त्यांच्या प्रेमदेवता या पहिल्या नाटिकेचा 1 ऑगस्ट 1930 रोजी बालमोहन संगीत मंडळीने पहिला प्रयोग केला. या नवीन प्रकारच्या नाटिकेमुळे आणि त्यास लागणाऱ्या कमी वेळामुळे प्रेक्षकांना पसंत पडला. गद्रे यांनी स्थापित केलेली “मुंबई नाटिका संगीत मंडळी’ ही नाट्यसंस्थाही स्थापन केली होती. त्यांच्या नाटिकांचे प्रयोग “नूतन संगीत मंडळी’ पण करीत असे.
दरम्यान, चरितार्थासाठी त्यांनी सुगंधी द्रव्याचे एक दुकानही काढले होते. त्यांनी संदेशकार अच्युतराव बळवंतराव कोल्हटकर यांना गुरुस्थानी मानलं व “संदेश’मधूनच पत्रकारितेचे धडे गिरवले. अच्युतराव खंदे टिळकभक्त व हाडाचे पत्रकार. त्यांचे संदेश हे पत्र तेव्हा चांगलेच गाजत असे. लोकमान्य टिळकांनी होमरूल लीग या स्वराज्याच्या मोहिमेसाठी देशव्यापी दौरा केला. त्यात संदेशचा विशेष बातमीदार म्हणून गद्रे यांनी टिळकांची कलकत्ता ते कोलंबो अशी साथ करून त्यांच्या भाषणांची खास वार्तापत्रं “संदेश’मधून प्रसिद्ध केली. त्यांचे हे वार्तांकन त्या काळात चांगलीच लोकप्रिय झाले. भाषण करताना टिळक कसे दिसत, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव कसे बदलत जात, आवाजात कसा चढउतार होई आदी गोष्टींचे हुबेहूब वर्णन करून ते वाचकांना जणू सभेच्या ठिकाणी नेत असत.
नाटक व पत्रकारितेबरोबर त्यांनी सामाजिक चळवळीतही भाग घेतला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणांनी गद्रे यांचे मन हेलावून गेले. अस्पृश्यता निवारण करण्यासाठी त्यांनी “झुणका भाकर सत्यनारायण’ आयोजित करायला सुरुवात केली. यात एखाद्या हरिजन जोडप्याच्या हस्ते ही पूजा होत असे. गद्रे त्या हरिजन जोडप्याच्या पायाचे तीर्थ प्राशन करीत आणि “झुणका भाकर’ या सर्वांना परवडणाऱ्या प्रसादाने पूजेची सांगता होत असे. असे तब्बल साडेतीन हजार सत्यनारायण करून त्यांनी महाराष्ट्र ढवळून काढला. परंतु त्यांच्याबद्दल आज कुणाला फारशी माहिती नाही.
करवीरपीठाचे शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांनी त्यांना समतानंद ही उपाधी दिली. 3 सप्टेंबर,1967 रोजी त्यांचे निधन झाले.