भवानीनगर – इंदापूर तालुक्यात उसाचे आगार असलेला फड हुमणी आळीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे. इंदापूर तालुक्यात तीन साखर कारखान्याकडे संभाव्य ऊस क्षेत्र 85 हजार एकर आहे. यातील सुमारे 3 हजार 100 एकर ऊस शेती खंगून गेला आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना वीस टक्के घाटा आला आहे. या बाधित क्षेत्रातून शेतकऱ्यांना 1 कोटी 27 लाख रुपयांचा फटका बसला आहे. त्यामुळे कारखान्यांचे धुराडे पेटण्यापूर्वी ऊस हुमणीच्या हल्ल्यातून वाचतो की नाही, या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे.
पाऊस पडल्यानंतर थोड्या फार प्रमाणात पावसाने ओढ दिल्यास भुंगे तयार होतात. हे भुंगे उसाच्या बुडाशी अंडी घालतात. याच अंड्यातून हुमणी अळी निर्माण होत आहे. ही आळी उसाच्या पिकासाठी घातक आहे. ही हुमणी माती खाली जाऊन मुळ्या पूर्णपणे खाऊन टाकत आहे. त्यामुळे उसाला होणारा अन्नपुरवठा पूर्णपणे बंद होत आहे. ऊस पूर्णपणे सुकून पाने पिवळी पडत आहेत. हुमणीमुळे उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकरी ड्रीपद्वारे हुमणी (आळी) नष्ट होण्यासाठी औषधे वापरत आहेत. तरीदेखील हुमणीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चाललेला दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पुढे हुमणीवर कशा पद्धतीने पर्याय काढला पाहिजे, हाच प्रश्न निर्माण झाला आहे.
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध होणार आहे. उसाच्या क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे. यावर्षी गळीत हंगामामध्ये श्री छत्रपती साखर कारखाना कार्यक्षेत्रातील साधारण नऊ लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध होणार आहे. परंतु कार्यक्षेत्रामध्ये हुमणीचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यात सुमारे 3 हजार एकर ऊस शेती हुमणीच्या भक्ष्यस्थानी पडणार आहे. शेतकरी प्रभावी उपाययोजना राबवित आहे. मात्र, यात अपयश येत असल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे आता चार महिन्यांत शेतकरी आर्थिकदृष्ट्या कंगाल होण्याच्या मार्गावर आहे.
सोळा गावे भयभीत : इंदापूर तालुक्यातील सणसर, बेलवाडी, हिंगणेवाडी, सपकळवाडी, मानकरवाडी, कुरवली, बोरी, काझड, लासुर्णे, अंथुर्णे, कळंब, चिखली, जांब, उद्धट, पवारवाडी, निंबोडी या गावांमध्ये हुमणीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडून पडले आहे.
संभाव्य ऊस क्षेत्रात घट : नीरा- भीमा, कर्मयोगी, श्री छत्रपती या तीन कारखान्यांकडे सुमारे 85 हजार हेक्टर ऊस गाळपासाठी आहे. या कारखान्यांच्या संभाव्य यादीनुसार वीस टक्के घट धरल्यास हुमणीच्या हल्ल्यात 3 हजार 100 एकर शेती वाळून खाक होणार आहे. नीरा- भीमाकडे 8 हजार हेक्टर आहे. तर कर्मयोगीकडे 10 हजार 480 हेक्टर आहे. श्री छत्रपतीकडे 6 हजार 896 हेक्टर ऊस उपलब्ध आहे. हुमणीने 20 टक्के ऊस गाळपापूर्वीच गिळकृंत झाला आहे.
इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना हुमणीमुळे उसाला साधारण एकरी पंधरा हजार रुपये तोटा होणार आहे. दरवर्षी वेगवेगळ्या रोगामुळे उसाच्या उत्पन्नामध्ये घट निर्माण होत आहे. हा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.
– आबासाहेब निंबाळकर, शेतकरी, सणसर.