दुबई – आयपीएलच्या यंदाच्या मोसमात प्लेऑफ गटातील तीन संघ निश्चित झाले आहेत. त्यामुळे आता चौथा संघ कोणता हे अद्याप निश्चित झालेले नाही. मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स व पंजाब किंग्ज यांच्यात या स्थानासाठी जोरदार चुरस रंगणार आहे.
बेंगळुरूने पंजाबचा पराभव करत प्ले ऑफमधील स्थान निश्चित केले. त्याआधी चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांनी प्लेऑफमध्ये स्थान मिळवले होते. आता चौथ्या स्थानासाठी तीन संघांत स्पर्धा आहे. पंजाबचा 6 धावांनी पराभव झाल्याने त्याच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. चेन्नई, दिल्ली आणि बेंगळुरू यांच्यानंतर आता प्लेऑफमध्ये कोणता संघ दाखल होणार याची उत्सुकता लागली आहे.
आता चौथ्या स्थानासाठी कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात स्पर्धा आहे. यातील पंजाब किंग्जला संधी खूपच आहे. त्यांची एकच लढत बाकी असून त्यात विजय मिळवल्यास त्यांचे 12 गुण होतील. जर 3 संघांनी पुढील सामन्यात केवळ एक विजय मिळवला तरच पंजाबला संधी मिळू शकते.
गुणतालिकेत कोलकाताचा संघ चौथ्या स्थानावर असून त्यांची एक लढत बाकी आहे. या लढतीत विजय मिळवल्यास त्यांचे 14 गुण होतील. मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्या दोन लढती बाकी आहेत. त्यांचे प्रत्येकी 10 गुण असून 14 गुण होण्यासाठी पुढील दोन्ही लढतीत विजय मिळवावा लागेल. या परिस्थितीत या तिनही संघांचे 14 गुण होतील आणि प्लेऑफमधील चौथा संघ नेट रनरेटच्या आधारावर निश्चित केला जाईल.