पुणे: राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे जे उमेदवार पराभूत झाले आहेत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी रविवारी राष्ट्रवादीने मुंबईत बैठक बोलावली होती. या बैठकीत राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की,ज्यांना अजूनही पक्ष सोडून जायच आहे त्यांनी लगेच जा.
या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह अजित पवार, श्रीनिवास पाटील, छगन भुजबळ असे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.
राज्यात विधानसभा निवडणूक सुरु असताना राष्ट्र्रावदीचे अनेक उमेदवार तळ्यात मळ्यात करत होते. पक्ष सोडावा कि नाही अशी त्यांची परिस्थिती होती. त्यामुळेच जनतेने तुम्हाला पराभूत केलं आहे. कारण जर तुमचाच ठाव ठिकाणा नसेल तर जनता तुम्हाला कसं मतदान करेल अशा शब्दात त्यांनी पक्ष सोडण्याच्या विचारात असलेल्यांचा समाचार घेतला आहे. तसेच जे सोडून गेलेत तेच आता येऊ का असं विचारत असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी उपस्थित असलेल्या जिल्हाध्यक्षांना देखील खडे बोल सुनावले आहेत. तर राज्यात पुढील पच वर्ष जनतेच्या प्रश्नांवर जोमाने काम करण्याचं आवाहनही त्यांनी विजयी उमेदवारांना केलं आहे.