कराड – शिक्षक संघ व शिक्षक समितीची नाळ व रक्तगट एकच आहे. शिक्षकांच्या, बॅंकेच्या हितासाठी व भ्रष्ट लोकांना हद्दपार करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. ज्यांना संपूर्ण पॅनल धडपणे उभे करता आले नाही, त्यांनी आमची मापे काढू नयेत, असा घणाघात शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात यांनी कराड येथील सभासद परिवर्तन पनेलच्या रेकॉर्ड ब्रेक प्रचार मेळाव्यात केला. समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी सखोल आकडेवारीसह सत्ताधाऱ्यांची पोलखोल करून त्यांच्या “अप’ प्रचारातील हवाच काढून घेतली.
या मेळाव्यास चंद्रकांत यादव, विश्वंभर रणनवरे, सी. एल. यादव, सुभाष शेवाळे, नवनाथ भरगुडे, शंकरराव देवरे, विलासराव घोलप, सुभाष ढालपे ,मोहन सातपुते, शशिकांत कांबळे, अंकुश नांगरे, अरूण पाटील, हणमंत साळुंखे, विनायक चव्हाण, नारायण शिंगटे, कृष्णाजी गुरव, सुदाम साळुंखे, उद्धव पवार, बसवराज दोडामणी, गणेश जाधव, कृष्णात हिरवडे, संतोष यादव, विजयकुमार भुजबळ, उमेदवार संजय नांगरे, ज्ञानबा ढापरे, किरण यादव, सौ. पुष्पलता बोबडे, सौ. निशा मुळीक, संजीवन जगदाळे, नितीन काळे आदी उपस्थित होते.
संभाजीराव थोरात म्हणाले, “”सत्ताधाऱ्यांना सर्व 21 जागांवर उमेदवार देता आले नाहीत. बरेचसे उमेदवार आयात केले गेले. त्यांचे शेकडो कार्यकर्ते सभासद परिवर्तन पॅनलमध्ये प्रवेश करीत आहेत. गेल्या चार वर्षात ज्या पद्धतीने शिक्षक बॅंकेत गैरव्यवस्थापन, गैरकारभार सुरू आहे ती सर्व बजबजपुरी आता पूर्णपणे चव्हाट्यावर आली आहे. बॅंकेचे व शिक्षकांचे हित जपण्यासाठीच उदय शिंदे व आम्ही एकत्र येण्याचा निर्णय विचारपूर्वक घेतला. एकीकरणाचा निर्णय हा केवळ बॅंकेपुरता मर्यादित नसून जुन्या पेन्शनसह विविध प्रश्न शासन दरबारी मांडून न्याय्य मागण्या पदरात पाडण्याचे काम आम्ही करीत आहोत. त्यासाठी राज्यातील 40 संघटना एकत्र आल्या आहेत. संघ, समिती एकत्र आल्यामुळे गैरकारभार करणाऱ्यांच्या पोटात दुखत आहे. तथापि, आमची नाळ आणि रक्तगट एकच आहे.
आमची युती नैसर्गिक आहे. शिक्षकांच्या मागण्यांसाठी आम्ही समन्वय समिती स्थापन केली आहे. त्याचे अध्यक्ष उदय शिंदे असून बलवंत पाटील यांच्यासह मान्यवर प्रमुख समन्वयक नेमले आहेत.” शिवाजीराव पाटील यांच्यावर गलिच्छ टीका करणारे आज मतांसाठी त्यांचा फोटो मिरवत आहेत. तीन वेळा संघातून हकालपट्टी झालेल्या नेतृत्वाला आता बॅंकेतून येत्या 19 तारखेला हद्दपार करा, असे आवाहन थोरात यांनी केले.
उदय शिंदे म्हणाले, “”सत्ताधाऱ्यांनी पॅनेलच्या नावात विकास हा शब्द वापरला आहे. पण त्यांनी फक्त स्वतःचा व साथीदारांचा विकास केला आहे. हे करताना बॅंकेचे वाटोळे केले. बॅंकेत घुसलेली ही बेलगाम व घातक प्रवृत्ती हद्दपार करा. त्यांना शिवाजीराव पाटील यांचे नाव घेण्याचा व त्यांचे फोटो वापरण्याचा नैतिक अधिकार नाही. पॅनलमध्ये विकास हा शब्द वापरायला त्यांना लाज वाटली पाहिजे. बॅंकेतील भरतीचा त्यांनी बट्ट्याबोळ केला. त्यांच्या गैरकारभाराला ब्रेक लावण्याचा निर्णय सभासदांनी घेतला आहे. त्यामुळे बॅंकेत आता परिवर्तन अटळ आहे.” बॅंकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवणार असून त्यात “शिक्षक भवन’ची पुनर्रचना करण्यात येणार आहेत, असे दोंदे गटाचे नेते दीपक भुजबळ यांनी सांगितले.
सेवानिवृत्तांना संचालक होण्याची संधी देण्यासाठी पोटनियमात दुरुस्ती करून निवृत्त सभासदांनाही संचालकपद मिळण्याची तरतूद केली जाईल. बॅंकेत मोबाईल बॅंकिंगला प्राधान्य देण्यात येणार असून एटीएम सेवा सभासदांना पुरवण्यात येईल. याशिवाय सभासदांच्या मुलांना स्पर्धा परीक्षांसाठी स्टडी रूम, ग्रंथालय उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेत्यांनी सांगितले.
सत्ताधारी पॅनेलची गळती सुरूच
सत्ताधारी पॅनलला लागलेली गळती या मेळाव्यात दिसून आली. पुस्तके गटाच्या महिला आघाडी अध्यक्षा राणी पाटील यांनी सभासद परिवर्तन पॅनलमध्ये महिला कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. संभाजीराव थोरात, उदय शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. याआधीच अंगापूर गटातील बी. एस. कणसे, सदाशिव कणसे, राजेंद्र कणसे यांच्यासह पुस्तके गटातील 200 कार्यकर्त्यांनी सभासद परिवर्तन पॅनलमध्ये प्रवेश केला. तर महिला आघाडीच्या अध्यक्षा स्वाती चव्हाण यांनीदेखील प्रवेश केल्याने सत्ताधारी पॅनलला भगदाड पडल्याची चर्चा सभासद मतदारांमध्ये आहे. नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघटनेचे राज्य नेते शरद बेस्के तसेच पुस्तके गटाचे रामभाऊ सोळसकर, संदीप राऊत यांनी परिवर्तन पॅनलला पाठिंबा जाहीर केला आहे.