“झाविमो’ 17 फेब्रुवारीला होणार भाजपात विलीन
नवी दिल्ली: झारखंड विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुलाल मरांडी 14 वर्षांनी भाजपमध्ये घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत. रांचीमध्ये 17 फेब्रुवारीला आयोजित भव्य कार्यक्रमात “झारखंड विकास मोर्चा’चे भाजपमध्ये विलीनीकरण होणार आहे.
बाबुलाल मरांडी यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची दिल्लीत भेट घेतली. या बैठकीत “झाविमो’ भाजपमध्ये विलीन करण्याचा निश्चित करण्यात आला आहे. अमित शहा आणि भाजपचे उपाध्यक्ष ओमप्रकाश माथुर यांच्या उपस्थितीत बाबुलाल मरांडी पुन्हा भाजपचा झेंडा हाती धरतील. यावेळी मरांडी “झारखंड विकास मोर्चा’ भाजपमध्ये विसर्जित करण्याची औपचारिक घोषणा करणार आहेत.
झारखंड विकास मोर्चाने 11 फेब्रुवारीला केंद्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. यामध्ये झारखंड विकास मोर्चाच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव मंजूर केला जाईल. त्यानंतर हा प्रस्ताव भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला पाठवण्यात येईल. त्यानंतर दोन्ही पक्ष याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला देतील. आयोगाच्या परवानगीने विलीनीकरण प्रक्रिया पार पडेल.
दरम्यान, 2006 मध्ये बाबुलाल मरांडी भाजपमधून बाहेर पडले होते. त्यांनंतर त्यांनी “झारखंड विकास मोर्चा’ची स्थापना केली. गेल्या वर्षी झालेल्या झारखंड विधानसभा निवडणुकांच्या वेळीच बाबुलाल मरांडी भाजपमध्ये परतण्याची अटकळ बांधली जात होती. या विधानसभा निवडणुकीत “झाविमो’ला केवळ पाच जागा मिळाल्या होत्या. तर भाजपच्या 12 जागा कमी झाल्याने त्यांनाही राज्यातील सत्ता गमवावी लागली होती.