मऊ – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका केवळ राज्यातील सरकार निवडण्यासाठी नसून भारताचे संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी महत्वाच्या आहेत असे प्रतिपादन समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केले आहे.
आज येथील सभेत बोलताना ते म्हणाले की ही बाब येथील मतदारांच्या लक्षात आली असून आत्तापर्यंत झालेल्या टप्प्यात भाजपचा निर्णायक पराभव होणार आहे हे आपण खात्रीने सांगू शकतो. ते म्हणाले की भाजपमध्ये त्यातून मोठी निराशा निर्माण झाली असून त्यातून ते आततायी प्रकार करीत आहेत.
स्वामी प्रसाद मौर्य यांच्यावर झालेला हल्ला आणि ओमप्रकाश राजभर यांचा अवमान ही त्याचीच उदाहरणे आहेत असे ते म्हणाले. आता चिंताग्रस्त झालेल्या लोकांची भाषा आणि वागणूक बदलली आहे, त्यांच्या चेहऱ्यावर आता पराभव दिसत आहे. ते नुसते हताश झाले नाहीत तर सपा नेत्यांचा अपमान करू लागले आहेत असा दावाही त्यांनी केला.
भाजपचे लोक जनतेशी खोटे बोलले असून अशा खोटे बोलणाऱ्यांना उत्तर प्रदेशातून हटवण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे, त्यामुळे जबाबदारीने मतदान करा असे आवाहन अखिलेश यांनी केले.