कल्याण – कल्याण ग्रामीण भागातील पाणी प्रश्नाबाबत मनसे आणि भाजप एकत्र आले असून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. पाणीप्रश्नी कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयावर मनसे आमदार राजू पाटील आणि भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मोठा मोर्चा काढत भाजप आणि मनसे आमदारांनी बैठकीत केडीएमसी, एमआयडिसी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
पाणी प्रश्नावरून तहान मोर्चाचे आयोजन केले होते. ज्याला भाजपनेही आपला पाठींबा दर्शवत सहभाग नोंदवला. कल्याण पश्चिमेच्या सर्वोदय मॉलपासून सुरू झालेल्या या आंदोलनामध्ये मनसे आणि भाजपचे अनेक नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मोर्चातील शिष्टमंडळ प्रशासनाशी चर्चा करण्यासाठी मुख्यालयात आले. परंतु या बैठकीला केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी आणि एमआयडीसीचे मुख्य अधिकारी उपस्थित नव्हते.
परिणामी मनसे आमदार राजू पाटील आणि भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांचा पारा चढलेला पाहायला मिळाला. हजारो नागरिकांना भेडसावणारा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी केडीएमसी अधिकारी अजिबात गंभीर नसल्याचा घणाघात या दोघांनी केला.