मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांना फोन करून त्यांच्या राज्यात झालेल्या दोन साधुंच्या हत्येबद्दल त्यांच्याशी चर्चा केली. या संबंधात उद्धव ठाकरे यांनी आपल्या ट्विटर संदेशात माहिती देतान म्हटले आहे की, या घटनेबाबत योगींशी फोन वरून संपर्क साधून आपण या घटनेची माहिती घेतली. या घृणास्पद हत्येचा आपण निषेध करतो आणि या गंभीर प्रकराबाबत आपण तुमच्या बरोबर आहोत असे आपण त्यांना सांगितले.
पालघर प्रकरणात आम्ही ज्या पद्धतीने त्वरीत कारवाई करून संबंधीतांना अटक केली तशीच कारवाई आपणही कराल अशी अपेक्षाही उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी बोलताना व्यक्त केली. याही घटनेला राजकीय रंग दिला जाऊ नये अशी अपेक्षाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.
\दरम्यान शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीहीं या घटनेचा निषेध करीत पालघरच्या घटनेप्रमाणे उत्तरप्रदेशातील या घटनेलाही धार्मिक विद्वेषाचे स्वरूप दिले जाऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनीही या घटनेचा तीव्र निषेध करीत संबंधीतांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेचे राजकारण केले जाऊ नये अशी अपेक्षा त्यांनीही व्यक्त केली आहे.
एप्रिल महिन्याच्या पंधरा दिवसांत उत्तरप्रदेशात किमान शंभर लोकांच्या हत्या झाल्या आहेत हा गंभीर मामला आहे असेही त्यांनी म्हटले आहे. एकाच ब्राम्हण कुटुंबातील पाच जणांच्या हत्येच्या प्रकरणावरूनही योगी सरकारवर विरोधकांकडून टीका सुरू आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही साधुंच्या हत्या प्रकरणाचा निषेध करीत योगी सरकारवर ताशेरे झाडले आहेत.