पाटणा – माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी करत सोमवारी बिहारचे माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी राजकीय खळबळ उडवून दिली. त्या मागणीवर पासवान यांचे पुत्र आणि लोजपचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. ती मागणी म्हणजे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे राजकीय कारस्थान असल्याचा आरोप चिराग यांनी केला.
नितीश यांचा जेडीयू आणि भाजपचा समावेश असणाऱ्या एनडीएचा घटक हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे (हम) मांझी प्रमुख आहेत. त्यांनी बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतानाच पासवान यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत चिराग यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
पासवान यांच्यावर उपचार सुरू असताना दिल्लीतील रूग्णालयाला त्यांच्या प्रकृतीची माहिती देण्यापासून कुणी रोखले? पासवान यांना भेटण्यापासून इतरांना रोखण्यात आले, असा आरोप मांझी यांनी केला. हमचे प्रवक्ते दानिश रिझवान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून मांझी यांच्या मागणीचे समर्थन केले आहे.
पासवान यांचे निधन झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी चिराग एक व्हिडीओ संदेश बनवण्याची रंगीत तालीम करत होते. त्यावेळी ते हास्यविनोद करत असल्याचे एका व्हायरल व्हिडीओमुळे समोर आल्याचेही त्यांनी नमूद केले.
मांझी यांच्या मागणीनंतर चिराग यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर आणि नितीश यांच्यावर निशाणा साधला. माझे वडील रूग्णालयात असताना मांझी यांचा मला फोन आला. त्यावेळी मी त्यांना सर्व काही सांगितले.
त्यानंतर त्यांचा पुन्हा फोन आला नाही आणि ते माझ्या वडिलांची भेट घेण्यासाठीही आले नाही, असे चिराग यांनी म्हटले. संबंधित मुद्द्यावर मांझी यांनी मोदींशी बोलावे. माझ्या वडिलांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी मोदी मला दररोज फोन करत असत, असेही त्यांनी नमूद केले.