औरंगाबाद : राज्यातील नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीवर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. नवीन जिल्हा बनवण्याची कुठलीच माहिती आमच्याकडे नाही. एक जिल्हा बनवायला किमान 700 ते 1000 कोटी रुपयांची गरज लागते. नवा जिल्हा निर्मिती करणे सोप्पे नसते. त्यामुळे कुठलाही जिल्हा होण्याचा प्रस्ताव नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
लातूर जिल्ह्यातून उदगिर जिल्हा वेगळा करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरु झाल्यानंतर राज्यभरात जिल्हा विभाजनाची चर्चा सुरु झाली होती. पण जिल्हा विभाजनाच्या चर्चेत कुठलेही तथ्य नसल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी ही माहिती दिली. यावेळी अजित पवार यांनी मराठवाड्यातील महत्वकांक्षी वॉटरग्रीड योजनेवरही भाष्य केले. यावरुन ही योजना बारगळण्याची शक्यता आहे. अजित पवार म्हणाले, मराठवाड्यातील वॉटरग्रीड योजना व्यवहार्य नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे या योजनेचा पुनर्विचार करण्याचे मत तज्ज्ञांनी नोंदवले आहे. यावेळी आगामी अर्थसंकल्पात वॉटरग्रीड योजनेसाठी तरतूद नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी अजित पवार यांनी सारथीच्या कामाबाबतही भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, सारथीची महत्त्वाची जबाबदारी आम्ही आयएएस अधिकाऱ्यांकडे देणार आहोत. सारथीच्या कामात चुका झाल्या असतील, तर त्याची चौकशी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.