नवी दिल्ली: लोकसभा निवडणूकीच्या 23 मे रोजी होणाऱ्या मतमोजणी दरम्यान लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या प्रत्येक विधानसभेतल्या 5 मतदान केंद्रातल्या VVPAT मशीनमधील मतपावत्यांची मोजणी प्रथम करावी. ती EVM मशीनबरोबर पडताळून पाहावी. या दोन आकड्यांत काही फरक दिसला तर सर्व VVPAT च्या मतपावत्यांची मोजणी करावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली होती.
मात्र, विरोधकांची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांच्या मोजणीत कोणताही फेरबदल होणार नसल्याचं स्पष्ट झाले आहे. आयोगाने आज झालेल्या बैठकीत विरोधकांची ही मागणी फेटाळून लावल्याचं सूत्रांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास बाकी असतानाच निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतल्याने विरोधाकांना मोठा झटका बसला आहे.