नवी दिल्ली: परदेशांतून आलेल्यांचे तातडीने विलगीकरण करायला हवे होते. तसे झाले असते तर कोरोना फैलावामुळे उद्भवणाऱ्या समस्यांमधून देशाला वाचवता येऊ शकले असते, अशा शब्दांत छत्तिसगढचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
बघेल यांनी गुरूवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी मोदी सरकारने आधीच पाऊले उचलायला हवी होती, अशा आशयाची भूमिका मांडली. परदेशांतून आलेल्यांची लगेचच तपासणी करून त्यांचे विलगीकरण करणे गरजेचे होते. त्यामुळे कोरोना देशभरात पसरला नसता. त्यातून जनतेला सध्या भेडसावणाऱ्या समस्या टाळता येऊ शकल्या असत्या, अशी परखड टिप्पणी त्यांनी केली.
लॉकडाऊनची मुदत वाढवायची का याविषयीचा निर्णय सर्व राज्यांशी चर्चा करूनच घेतला जावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 एप्रिलला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. त्यावेळी लॉकडाऊनबाबत केंद्र सरकारची काय भूमिका आहे ते आम्ही पाहू. त्यानंतर 12 एप्रिलला छत्तिसगढ मंत्रिमंडळाची बैठक होईल. त्या बैठकीत पुढील पाऊलांविषयीचा निर्णय होईल, असे बघेल यांनी स्पष्ट केले.