नवी दिल्ली – हिंदुंनी शस्त्र हाती घेण्याची वेळ आली आहे. जर भारताला मुस्लिम पंतप्रधान मिळाला तर 50 टक्के हिंदु येत्या 20 वर्षात धर्म बदलतील, असे पुन्हा एकदा स्फोटक वक्तव्य गझीयाबादच्या दसना देवी मंदीराचे मुख्य पुजारी यती नरसिंहानंद यांनी रविवारी केले. ते येथील बुरारी मैदानावर झालेल्या हिंदू महापंचायतीत बोलत होते. या पंचायतीत सुमारे 200 जण सहभागी झाले होते.
सेव्ह इंडिया फाऊंडेशनचे संस्थापक प्रीतसिंग यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गेल्या वर्षी जंतर मंतरवर झालेल्या कार्यक्रमात मुस्लिमविरोधी घोषणा देण्यात आल्या होत्या, त्याच्या आयोजनातही सिंग यांचा सहभाग होता.त्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी त्यांना अटक केली होती. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. हरिद्वार येथील प्रकरणात नरसिंहानंद यांना अटक झाली होती. तेही सध्या जामिनावर बाहेर आहेत.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना नरसिंहानंद म्हणाले, जर भारतात मुस्लिम पंतप्रधान झाला तर 40 टक्के हिंदुची हत्या करण्यात येईल. हे हिंदुंचे भविष्य आहे. जर ही परिस्थिती बदलायची असेल तर मर्द बना. मर्द कोण? तर जो हातात शस्त्र घेतो तो मर्द.
या कार्यक्रमाची परवानगी घेण्यात आली नसल्याचे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र प्रीतसिंग यांच्या ट्विटर अकाऊंटवर या कार्यक्रमाचे आयोजन चार जानेवारीला करण्यात आले होते.
या कार्यक्रमांचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना जमावाने मारहाण केली. पोलिसांनी त्यांना घटनास्थळापासून दूर नेले. त्यांना मुखर्जी नगर पोलिस ठाण्यात थांबवून ठेवण्यात आल्याचा आरोप काही पत्रकारांनी केला. दिल्ली पोलिसांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला.
त्यांच्या उपस्थितीवर जमावातील काही जणांनी आक्षेप घेतल्याने सुरक्षेसाठी ते स्वत:हून पोलिसांकडे आले. कोणालाही पोलिसांनी ताब्यात घेतले नाही. योग्य ते संरक्षण पुरवण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त उषा रंगराणी यांनी सांगितले.