मुंबई – भारतीय युवा संघाने आयसीसी 19 वर्षांखालील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे यंदा विजेतेपद पटकावले. त्यावेळी मोठा गाजावाजा करत बीसीसीआयने प्रत्येक खेळाडूला रोख पुरस्कार जाहीर केले. मात्र, आता तब्बल दोन महिने उलटल्यावरही अद्याप या खेळाडूंना रोख रकमेचे पुरस्कार मिळालेले नाहीत. तसेच याबाबत काही खेळाडूंनी समन्वयकाच्या माध्यमातून बीसीसीआयशी संपर्क साधल्यावरही त्यांना अद्याप कोणतेही समाधानकारक उत्तर मिळालेले नाही.
भारताच्या 19 वर्षांखालील युवा संघाने 5 फेब्रुवारी रोजी आयसीसीचा 19 वर्षांखालील विश्वकरंडक पटकावला होता. त्यानंतर बीसीसीआयने विश्वविजेत्या भारतीय युवा संघातील खेळाडूंना प्रत्येकी 40 लाख रुपये देण्याची घोषणा केली. मात्र, तब्बल दोन महिन्यांनंतरही बीसीसीआयने या विश्वविजेत्या संघाला बक्षीस रक्कम दिलेली नाही.
या कालावधीतच बीसीसीआयने आयपीएलच्या माध्यमातून तब्बल 7 हजार 800 कोटींची कमाई केली. मात्र, आता त्यांनाच युवा संघाबाबत केलेल्या घोषणेचा विसर पडला आहे. या खेळाडूंना द्यावी लागणारी रक्कम जवळपास 7 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ अशी ख्याती असलेल्या बीसीसीआयवर सध्या याच दुर्लक्षामुळे टीका सुरू झाली आहे.
विश्वकरंडक स्पर्धेत अंतिम लढतीत इंग्लंडचा पराभव करत विक्रमी सहावे विश्वकरंडक विजेतेपद भारताच्या युवा संघाने मिळवले होते.
त्यानंतर लगेचच बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांनी बक्षिसाची घोषणा केली होती. त्यात संघातील प्रत्येक खेळाडूला 40 लाख व सपोर्ट स्टाफला प्रत्येकी 20 लाख देण्याची घोषणा केली होती. विश्वविजेतेपद मिळवून देणाऱ्या संघात एकूण 17 खेळाडू होते. सपोर्ट स्टाफमधील व्यक्तींनाही अद्याप कोणतीही रक्कम मिळालेली नाही.
महिला संघालाही करावी लागली होती प्रतीक्षा
बीसीसीआयच्या या कृतीवर सातत्याने टीका होत आहे. यापूर्वी महिला संघासह देशांतर्गत स्पर्धेतील रणजी करंडक, सय्यद मुश्ताक अली स्पर्धा, विजय हजारे करंडक विजेत्या खेळाडूंनाही बीसीसीआयच्या असाच दुर्लक्षाचा फटका बसला आहे. भारताच्या महिला संघाने 2020 साली टी-20 विश्वकरंडक स्पर्धेचे उपविजेतेपद मिळवले होते. मात्र, या संघालाही तब्बल दीड वर्षे पुरस्कार रकमेची प्रतीक्षा करावी लागली होती.