पुणे – रक्षाबंधन दि. 30 ऑगस्टला साजरे केले जाणार आहे. हातावर राखी बांधण्यासाठी कोणत्याही वेगळ्या मुहूर्ताची आवश्यकता नाही, अशी माहिती “दाते पंचांगकर्ते’चे मोहन दाते यांनी दिली.
रक्षाबंधन हा सण म्हणजे उपनयन संस्कार, विवाह, वास्तुशांत याप्रमाणे मंगल कार्य नाही. तर सामाजिक आणि कौटुंबिक उत्सव आहे. त्यामुळे बुधवारी भद्रा काल असला तरी भद्रा असतानाच्या काळात म्हणजे दिवसभरात आपल्या सोयीने केव्हीही रक्षाबंधन साजरे करता येईल, असे दाते यांनी स्पष्ट केले आहे.
पूर्वीच्या काळी रक्षाबंधनाचा अर्थ बहिणीने भावाला राखी बांधणे एवढाच अभिप्रेत नव्हता. त्याकाळी रक्षाहोमाद्वारे रक्षासूत्र तयार करून ते राजाला बांधले जायचे, अशा पद्धतीने रक्षाबंधन विधिवत करण्यासाठी भद्राकाल वर्ज्य केला जात असे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ज्यांना रक्षाबंधन विधिवत करावयाचे आहे त्यांनी भद्राकाल वर्ज्य करावा. म्हणजेच रात्री 9:02 मिनिटांनंतर रक्षाबंधन साजरे करावे.