मांडवगण फराटा – लॉकडाऊनमुळे शेतीसह विविध उद्योगधंदे अडचणीत आले आहेत. शिरूरच्या पूर्व भागात नागरगाव, मांडवगण फराटा, आंधळगाव, रांजणगाव सांडस, वडगाव रासाई, आलेगाव पागा, सादलगाव परिसरात गूळ निर्मिती करणारी 15 पेक्षा जास्त गुऱ्हाळ आहेत. गुळ कारखान्यात काम करणारे कामगारही बिहार, उत्तरप्रदेश या परराज्यातील असून लॉकडाऊनमुळे हा व्यवसाय संकटात सापडला आहे.
यामध्ये अनेक गुळ कारखान्याची प्रतिदिन 1 टन गूळ निर्मिती क्षमता आहे. परंतु लॉकडाऊनमुळे गुऱ्हाळे पूर्ण क्षमतेने चालत नसल्याने कामगारांना रोजगार मिळत नसल्यामुळे कामगारांपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
शिरूरच्या पूर्व भागातील अनेक गावे ही भीमा व घोडनदी काठ असल्याने पाणी मुबलक असल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात उसाचे उत्पन्न घेतले जाते. यामध्ये एप्रिल व मे महिन्यात कारखाने बंद होत असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात गुऱ्हाळाला उस देतात.
पर्यायाने त्यांना गुऱ्हाळचालक बाजारभावही चांगला देतात. करोनामुळे अनेक ठिकाणी गावबंदी असल्याने उसतोड कामगारांना त्या गावात उसतोड करता येत नाही. त्यामुळे गुऱ्हाळचालकांना त्यांच्याच गावात उस शोधावा लागत आहे.
बाजारपेठा बंदमुळे गुळाला मागणी नसल्यामुळे काही गुऱ्हाळ बंद आहेत. काही ठिकाणी कमी प्रमाणात उत्पन्न सुरू आहे. मागणी नसल्यामुळे एक महिन्यांपूर्वी प्रतिटन 2800 रुपये असलेला बाजारभाव आता 2400 रूपये झाल्यामुळे शेतकऱ्यांचा टनामागे 300 रूपयांचा तोटा होत आहे.
काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याचे चित्र दिसत आहे. काही ठिकाणी कामगारांना मास्क व सॅनिटायझरची सोय चालकांकडून केली नसल्याने कामगारांच्या जिवाशी खेळ केल्याचे विदारक चित्र दिसत आहे. अनेक ठिकाणी कामगार कमी प्रमाणात असल्याने उत्पादन बंद आहे.