पुणे – पावसाने घेतलेली विश्रांती आणि धरणातील पाणी स्थिरावल्याने गेल्या आठवड्यापासून येणाऱ्या गढूळ पाण्याचे प्रमाण कमी होऊ लागले आहेत. तसेच महापालिकेकडून ज्या भागात मोठ्या प्रमाणात गढूळ पाणी येत होते.
त्या भागातील मुख्य जलवाहिन्या पाणी सोडून टप्प्याटप्प्याने स्वच्छ केल्याने पुन्हा स्वच्छ पाणी येऊ लागले आहे. काही दिवसांपूर्वी या पाण्याची गढुळता तब्बल 200 नेफोलोमॅट्रीक टर्बिडीटी युनिट होती. ती आता 50 युनिटपर्यंत खाली आली असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीच्या पाणलोट क्षेत्रात मागील दोन आठवड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. परिणामी, धरणांमध्ये माती वाहून आल्याने धरणातील पाणी प्रचंड गढूळ बनले होते.
गढुळता मोजण्याच्या मानकानुसार, हे पाणी तब्बल 200 टर्बिडीटी होते. गेल्या 25 ते 30 वर्षात पहिल्यांदाच इतके गढूळ पाणी आले होते. त्यामुळे महापालिकेसही हे पाणी स्वच्छ करण्यासाठी कसरत करावी लागली, त्यानंतरही पुरवठा केले जाणारे पाणी 6 टर्बिडीटीपर्यंत स्वच्छ होते. प्रत्यक्षात ते मानकानुसार, एक टर्बिडीटी असणे आवश्यक आहे.
मात्र, आता पाणलोट क्षेत्रात पाऊस थांबल्याने तसेच धरणातील पाणीही स्थिरावल्याने पाण्याचा मातकटपणा कमी झाला आहे. परिणामी, महापालिकेसही काही प्रमाणात दिलासा मिळाला असून शहरात पुन्हा पूर्ववत पाणीपुरवठा होत आहे.
दरम्यान, अद्यापही काही प्रमाणात पाणी गढूळ असल्याने ते पिण्यासाठी स्वच्छ असले तरी, नागरिकांनी उकळून तसेच गाळून आणि थंड करून प्यावे, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.