सातारा -साताऱ्यात पालिकेचा कारभार “आंधळं दळतयं आणि कुत्रं पीठ खातयं,’ अशा पध्दतीने सुरू आहे. करार तत्वावर घेतलेले परिवहन विभागाचे वाहन शनिवारी रात्री परस्पर विनापरवाना थेट कास रस्त्याला पोहचल्याचा प्रकार घडला आहे. या गंभीर प्रकारावर पालिका प्रशासनाने विश्वामित्री पवित्रा घेत हे प्रकरण झटकण्याचा प्रयत्न केला आहे.
सातारा पालिकेचा परिवहन विभाग झोपा काढतो काय, असा प्रश्न असून इतक्या गंभीर प्रकरणाबाबत परिवहन विभागाचे अधिकारी प्रणव पवार काहीच माहित नसल्याचा आव आणू लागल्याने सातारा पालिकेत किती जबाबदारीने कारभार चालतो हेच चव्हाट्यावर आले आहे. पालिकेने करोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी (कंटेनमेंट झोनची पाहणी करणे, ताबडतोब विशिष्ट घटनास्थळी पोहोचणे), चार वाहने करार तत्वावर घेतली आहेत. परिवहन विभागाने या वाहनांवर नियंत्रण ठेवणे, त्यांना परवानगी देणे, रोजच्या किलोमीटरचा हिशोब ठेवणे आदी कामे करावयाची आहेत. संध्याकाळी पालिकेचे कामकाज संपल्यावर गाडी चालक परिवहन विभाग वाहनांचे लोकेशन चेक करतात.
मात्र, शनिवारी पालिकेच्या करार तत्वावर धावणारी तवेरा कार थेट कास रस्त्यावरील एकीव परिसरात पोहचली. आरोग्य विभागाच्या एका आरोग्य निरिक्षकांच्या घरपोच सेवेसाठी पालिकेचे वाहन विनापरवाना परस्पर हद्दीच्या बाहेर पळवण्यात आले. गाडीने आरोग्य निरीक्षकांना पालिकेच्या कार्यालयाजवळ सोडले. मात्र, कास परिसरातल्या काही सतर्क नागरिकांनी पालिकेची गाडी कासला कशी पोहचली याची माहिती घेतली तेव्हा पालिकेच्या आरोग्य निरीक्षकांच्या खासगी पार्टीचा किस्सा समोर आला. मग त्यासाठी पालिकेच्या वाहनाचा वापर कोणत्या नियमाने झाला, याचे उत्तर कोणाकडेच नाही. आरोग्य निरीक्षकांची पार्टी व गाडीचा विनापरवाना वापर याची मुख्याधिकाऱ्यांपासून ते परिवहन अधिकाऱ्यांपर्यंत कोणालाच कल्पना नव्हती.
बेताल वागणारे पाठीशी
सर्वसामान्य सातारकरांना नियमावर बोट ठेऊन नडवणाऱ्या प्रशासनाचा कारभार किती भोंगळ आहे हे यानिमित्ताने पाहयला मिळाले. परिवहन विभागाचे अधिकारी प्रणव पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी “घडल्या प्रकाराची मला कल्पनाच नाही. जरा माहिती घेतो असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी तर आपण त्या गावचेच नाही असे दाखवले. मी दिवसभर प्रांतांच्या बैठकीकडे होतो असे उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांनी सांगितले. दुबई वारी प्रकरणात याच आरोग्य निरीक्षकांना मुख्याधिकाऱ्यांनी नोटीस बजावली होती. त्याचा खुलासा काय झाला, याचा आजतागायत सातारकरांना पत्ता नाही. त्यात करोना संक्रमणाच्या काळात आरोग्य निरीक्षकांच्या पार्टीचे प्रकरण समोर आल्याने बेताल वागणाऱ्यांना प्रशासन कसे पाठीशी घालते, याची चर्चा सुरू आहे.