नवी दिल्ली – कर्णधार महेंद्रसिंग धोनी, सिक्सरकिंग युवराज सिंग, गौतम गंभीर असे नावाजलेले खेळाडू संघात होते मात्र, तरीही 2011 साली झालेली विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा केवळ मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरमुळेच जिंकण्यात यश आले, असे भारताचा अव्वल क्रिकेटपटू सुरेश रैना याने म्हटले आहे.
भारतीय क्रिकेटची पंढरी मानल्या जात असलेल्या मुंबईतील एतिहासिक वानखेडे मैदानावर 9 वर्षांपूर्वी 2 एप्रिल 2011 या दिवशी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचा श्रीलंकेविरुद्धचा अंतिम सामना रंगला. या संपूर्ण स्पर्धेत युवराजने आपल्या अष्टपैलू खेळाने कमाल केली. धोनीने अफलातून नेतृत्व तसेच बेस्ट फिनिशरचा रोल वठवला. अंतिम सामन्यात गंभीरने महत्वपूर्ण खेळी केली. संपूर्ण स्पर्धा सांघिक कामगिरीवर गाजली. मात्र, हे सगळे असले तरीही त्यात सचिनने वठवलेला मेंटॉरचा रोल ही स्पर्धा जिंकण्यात सर्वात जास्त महत्त्वाचा ठरला.
स्पर्धेतील प्रत्येक सामना जिंकायलाच हवा असे कोहलीचे मत असायचे, तर सचिन मात्र, त्यावेळी आपल्या योजना अपयशी ठरल्या तरी प्लॅन बी तयार ठेवण्यासाठी महत्त्वाच्या सूचना द्यायचा. संघातील एकाही खेळाडूवर अतिरिक्त दडपण तो येऊ देत नव्हता. तो कर्णधार नव्हता तराही नेतृत्व तोच करताना दिसायचा. संघातील सर्वात अनुभवी खेळाडू, जगातील सर्वात श्रेष्ठ फलंदाज असतानाही सचिन नव्या खेळाडूच्या मतालाही महत्त्व देत होता.
सामना कोणत्याही संघाशी असो सचिन कायम त्या संघातील खेळाडूंच्या कमकुवत दुव्यांचा विचार करायचा व त्यानुसार सर्व खेळाडू योजना तयार करायचे, असेही रैनाने स्पष्ट केले. धोनीपेक्षाही सचिन जास्त शांत असायचा. त्याचा खेळच नाही तर त्याचा क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टिकोनच संघातील सहकारी खेळाडूंना प्रेरणा देण्याचे काम करायचा. या संपूर्ण स्पर्धेत सचिन संघातील सर्वात महत्त्वाचा खेळाडू नाही तर जणू दुसरा प्रशिक्षकच होता.
नशीबवान ठरलो….
आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असताना मला सचिन आणि कोहलीसह एकाच संघात खेळायला मिळाले यासाठी मी स्वतःला नशीबवान समजतो. ज्या संघात जागतिक क्रिकेटमधील दोन दादा फलंदाज आहेत त्या संघाचा मी एक भाग होतो हेच नव्या पिढीला सांगताना मला आता आयुष्यभर अभिमान वाटेल, असेही रैनाने व्यक्त केले.