मुंबई – सरलेल्या आठवड्यात अनिश्चित परिस्थितीतही गुंतवणूकदारांनी बरीच खरेदी केल्यामुळे शेअर निर्देशांक वाढले. विशेषत: शेवटच्या दिवशी जोरदार खरेदी झाल्यामुळे निर्देशांक उसळून गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचे मूल्य शुक्रवारी एकाच दिवसात 1.4 लाख कोटी रुपयांनी वाढले. आता मुंबई शेअरबाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे भांडवली मूल्य 146.59 लाख कोटी रुपयांवर गेले आहे. मात्र, आगामी आठवड्यात गुंतवणूकदारांचे निर्णय लोकसभा निवडणुकाच्या आधारावर राहतील.
रविवारी जाहीर होणाऱ्या एक्झिट पोलच्या आधारावर गुंतवणूकदार आठवड्याच्या सुरुवातीच्या काळात आपले निर्णय घेतील. किंबहुना स्थिर सरकार येण्याच्या अपेक्षेने गुंतवणूकदारांनी बरीच खरेदी केली आहे. मात्र, खरा निकाल 23 तारखेच्या सायंकाळी उपलब्ध होणार आहे. या निकालाचा परिणाम 24 मे रोजी होणाऱ्या कामकाजावर होण्याची शक्यता आहे. सध्या गुंतवणूकदार थांबा आणि वाट पाहा या मनस्थितीत आहेत, असे ब्रोकर्सनी सांगितले.