नवी दिल्ली: आधीच्या राज्यकर्त्यांनी मतपेढीच्या राजकारणासाठी ट्रिपल तलाकच्या प्रथेला राजाश्रय दिला होता. पण नरेंद्र मोदी यांनी ट्रिपल तलाकची प्रथा हा फौजदारी गुन्हा ठरवला. त्यामुळे मुस्लिम महिलांमध्ये आत्मविश्वास वाढला आणि त्या अधिक आत्मनिर्भर होऊ शकल्या असे प्रतिपादन केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केले आहे.
ट्रिपल तलाक विरोधी विधेयक संमत झाल्याच्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्त देशातील मुस्लिम महिलांची एक बैठक दूरदृष्य प्रणालीद्वारे घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की हा कायदा झाल्यापासून मुस्लिम समाजात तलाक देण्याच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे.
अल्पसंख्य समाजाचे राजकीय शोषण करण्याऐवजी या समाजाचे राजकीय सशक्तीकरण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
1 ऑगस्ट रोजी अस्तित्वात आलेल्या ट्रिपल तलाक विरोधी कायद्यामुळे एका जाचक प्रथेतून देशातील मुस्लिम महिलांची मोदी सरकारने सुटका केली असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी कायदा मंत्री रविशंकरप्रसाद आणि महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी हेही उपस्थित होते.