– उत्कर्ष खवले
वानवडी – सकाळीच हातात हातोडा घेऊन दिवसभर दगड फोडत बसयाचे. उन्हा-तान्हात दुपारच्या सुमारास विसाव्याला कुठेतरी झाडाखाली बसायचे. रात्र झाली की दोन घास खायचे आणि जमिनीला पाठ टेकवून डोक्याखाली धोंडा घेऊन विश्रांत्ती घ्यायची, हा दिनक्रम आहे दगड खाण कामगारांचा आणि त्यांच्या लहान मुलांचा, देशाला स्वातंत्र मिळून साठ वर्षे झाली तरी अन्न, वस्त्र,निवारा या मुलभूत सुविधांपासून दगडखाण कामगारांची मुले अद्याप वंचित असल्याचे चित्र परिसरातील रस्त्यारस्त्यावरील डांबर काम करताना दगड फोडत असतानाचे दिसत आहे.
दगड फोडणारा कामगार वर्ग कितपत संघटीत आहे.याची नोंद अद्याप कोठेही नसल्याचे दिसते. शासनाच्या सेवेत असलेल्या महिलांना बाळंतपणाची सहा महिने रजा मिळते, मात्र दगडफोड काम करणाऱ्या महिलांना अशा रजा नाहीत.आपल्या देशात असंघटीत कामगारांची संख्या मोठी आहे. या कामगारांना आठवड्यातून किमान एक तरी सुट्टी पगारी मिळावी.या कामगारांसाठी किमान सुविधा तरी द्याव्यात,अशी मागणी या समाजातील नागरीकांकडून करण्यात येत आहे.मात्र त्याचा पाठपुरावा पुरेशा प्रमाणात होताना दिसत नाही.
बालकामगार कामावर ठेवू नयेत. असा कायदा शासनाने केला आहे. या कायद्याची अमलबजावणी मात्र काटेकोरपणे होताना दिसत नाही.दगड खाण कामगारांची मुले अद्यापही शिक्षणापासून वंचित आहेत. शिक्षण हा सर्वांचा हक्क आहे. आणि तो प्रत्येकाला मिळाला पाहिजे, अशी ओरड करण्यात येत असली तरी प्रत्यक्षात या मुलांपर्यत शिक्षणाची संधी पोहोचविण्यासाठी व्यापक प्रमाणात प्रयत्न होणे आवश्यक आहे.उपनगर आणि लगतच्या भागातील गावामधील दगडखाणीमध्ये काम करणाऱ्यांची संख्या तशी मोठी आहे.संपूर्ण राज्यात हे काम विखुरलेले असल्यामुळे त्यांची संख्या चटकन लक्षात येत नसल्याचे दिसत आहे.
दगडखाण व रस्त्यारस्त्यावर दगडी फोडणारया बालमजुरांची संख्याही मोठी आहे. लहान वयातच हातात पाटीपेन्सिल घेण्याऐवजी त्यांच्या हातात हातोडा दिला जात आहे. त्यामुळे शाळा,महविद्यालय यांची या मुलांना साधी ओळखही नसते.समाज साक्षर झाला पाहिजे यासाठी समाजसुधारक मंडळी ओरडत आहेत.राजकारणीही त्यामध्ये आपला सुर मिसळताना दिसत आहेता.मात्र काम करण्यासाठी फारसे कोणी पुढे येताना एवढे दिसत नाहीत.