राज्यात अद्याप दिलासादायक पाऊस पडलेला नाही. शेतकरीही पावसाची प्रतिक्षा करत आहे. यातच आता हवामान विभागाकडून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. येत्या चार दिवसात राज्यातील काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय राज्यातील अनेक भागात दिवसभर ढगाळ वातावरण असल्याचे पाहायला मिळते.
येत्या 4 दिवसात 16 ते 19 जुलै दरम्यान कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील काही भागातही विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारपासून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्टही देण्यात आला आहे. राज्यात पूर्णपणे मान्सून सक्रिय झाला आहे, मात्र महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना अद्यापही पावसाची प्रतिक्षा आहे.
बंगालच्या उपसागरात होणाऱ्या बदलांचा परिणाम राज्यातील पावसावर होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली. 15 जुलै रोजी बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होऊन 19 जुलै रोजी आणखी एक चक्रीवादळ तयार होईल. यामुळे महाराष्ट्रासह मध्य भारतात पाऊस वाढणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस.होसळीकर यांनी व्यक्त केला आहे.
यातच आता येत्या 4 दिवसात पाऊसाला सुरुवात झाल्यास शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. तर पुणे शहरात पुन्हा पवसाला सुरुवात झाली, मात्र पावसाची जोर अजूनही समाधानकारक नाही. काल दिवसभर पाऊस आणि ढगाळ वातावरण असा अनुभव पुणेकरांनी घेतला. दिवसभरात 0.3 मिमी पावसाची नोंद झाली. तर वडगावशेरी परिसरात 2.5 मिमी पाऊस झाला. पुढील दोन ते तीन दिवसभरात शहरातील हवामान ढगाळ राहील. काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडतील, तर कमाल तापमान 28 ते 29 च्या आसपास राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.