सोमेश्वरनगर -करोनाची दुसरी लाट आली असताना बारामती तालुक्यातील ग्रामीण भागात त्याचे गांभीर्य दिसून येत नाही. सोमेश्वरनगर परिसरात सोमेश्वर सहकारी कारखान्याचा ऊस गळीत हंगाम सुरू झाला असल्याने नेहमीपेक्षा लोकसंख्येत चांगलीच भर पडली आहे.
करोनामुळे कारखाना परिसरही गजबजून गेला आहे. मंदिर, हॉटेल व इतर सर्व दुकानेही खुली करण्यात आली आहे. मात्र नागरिक करोनाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळत नसल्याचे निदर्शनात येत आहे. सोमेश्वरनगर कारखाना परिसरातील करंजेपूल, वाणेवाडी, वाघळवाडी परिसरात मोठी गर्दी होत आहे. सोमेश्वरनगरमध्ये वाणेवाडी व करंजेपूल येथील आठवडे बाजार असतो. कारखाना सुरू असल्याने बाहेरगावाहून आलेले ऊसतोड मजुरांची संख्या जादा आहे.
आठवडी बाजारात गृहपयोगी वस्तू व भाजीपाला घेण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. तरी नागरिक विनामास्क, सुरक्षित अंतर, सॅनिटायझरचा वापर करताना दिसत नाहीत. करंजेपूल येथे दूरक्षेत्र मध्यावर असताना देखील नागरिकमध्ये पोलीस प्रशासनाची भीती दिसून येत नाही. दिखावा म्हणून पोलीस कर्मचारी विनामास्क, ट्रिपलशीट आणि विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करीत आहे काय, असा सवाल सामान्य नागरिक करीत आहेत.करंजेपूल येथील हाकेच्या अंतरावर असणारा आठवडे बाजार आहे. बाजारात दर आठवड्याला मोबाइल चोरीचे प्रकार घडत आहे. मात्र, पोलीस प्रशासनाकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.
बारामतीतील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, सध्या थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत. करोनाचे रुग्ण हळूहळू वाढू लागले आहेत. त्यामुळे सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहेत. त्यासाठी मास्क व सॅनिटायझरचा वापर व सोशल डिसन्टन पाळणे आवश्यक आहे, नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. ज्येष्ठ नागरिक आणि इतर आजार असलेल्या नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे.
– डॉ. मनोज खोमणे, तालुका वैद्यकीय अधिकारी, बारामती.