पुणे -शहरातील बाईक-टॅक्सी सेवा पूर्णपणे बंद करावी, रिक्षा परमिट बंद करावे, अशा विविध मागण्यांसाठी रिक्षा संघटनांनी पुणे प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयासमोर सोमवारी चक्काजाम आंदोलन केले. आंदोलनामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मध्यस्थी करून जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रात्री उशिरा बेमुदत बंद स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचे बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांनी सांगितले.
सोमवारी सकाळी 10 वाजल्यापासून रिक्षाचालकांनी संपाला सुरुवात केली. पुण्यातील महत्वाच्या 12 रिक्षा संघटनांनी या संपात सहभाग घेतला होता. 10 वाजल्यानंतर 12 रिक्षा संघटनांचे रिक्षाचालक आरटीओ कार्यालय परिसरात जमायला सुरुवात झाली.
बघता-बघता हजारोंच्या संख्येने रिक्षाचालक येथे हजर झाले. यावेळी विविध रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींनी भाषणे करून बेकायदा बाईक टॅक्सी बंद झालीच पाहिजे तसेच आरटीओ विरोधात जोरदार घोषणा बाजी केली. त्यांच्या घोषणांनी आरटीओ कार्यालयासमोरील परिसर दुमदूमून गेला होता. रिक्षाचालकांकडून आरटीओ कार्यालय परिसरात काही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
लांबच लांब रांगा
बंदमध्ये सहभागी होण्यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातून हजारोच्या संख्येने रिक्षाचालक रिक्षांसह आरटीओ कार्यालय परिसरात आले होते. त्यामुळे रिक्षांच्या रांगा संगम पुलापासून लागल्या होत्या. शवाजीनगर येथील इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत रिक्षांच्या रांगा लागल्या होत्या.
समिती स्थापन करणार
जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. समितीत पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे, रिक्षा संघटनेचे प्रतिनिधी यांचा समावेश असणार आहे.
बंदमध्ये सहभागी संघटना
महाराष्ट्र रिक्षा पंचायत, बघतोय रिक्षावाला फोरम, आम आदमी रिक्षाचालक संघटना पुणे शहर (जिल्हा), वाहतूक सेवा संघटना, शिवनेरी रिक्षा संघटना, अजिंक्य रिक्षा संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना, आरपीआय रिक्षा वाहतूक आघाडी, आशीर्वाद रिक्षा संघटना, एआयएमआयएम रिक्षाचालक संघटना, शिवा वाहतूक संघटना, राष्ट्रीय एकता रिक्षा महासंघ या संघटनांनी रिक्षा बंद आंदोलनात सहभाग घेतला होता.
उच्च न्यायालयात आज सुनावणी
बाईक टॅक्सीच्या विरोधात पुण्यात रिक्षाचालकांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओने) रॅपिडो बाईक टॅक्सीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर रॅपिडोकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकमध्ये त्यांनी पुणे आरटीओला प्रतिवादी केले आहे. त्यामुळे पुणे आरटीओकडून मंगळवारी उच्च न्यायालयात म्हणणे मांडण्यात येणार आहे. याबाबत रॅपिडोच्या प्रवक्त्यांनी सांगितले, की उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये सेवा सुरू करण्यास परवानगी द्यावी. तसेच, त्यांच्या चालकांना त्रास देऊ नये, अशी मागणी केली आहे.
नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही सध्या संप मागे घेत आहेत. पालकमंत्र्यांनी समिती स्थापन करून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. पण 12 डिसेंबरपर्यंत बाईक-टॅक्सी बंद झाल्या नाहीत तर पुन्हा रिक्षा बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे सर्व संघटनांनी ठरवले आहे.
-डॉ. केशव क्षीरसागर, अध्यक्ष, बघतोय रिक्षावाला संघटना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री चद्रकांत पाटील यांनी बैठक घेऊन यावर निर्णय घेण्याचे आश्वसन दिले आहे. त्यामुळे आम्ही आंदोलन मागे घेत आहेत. पण 12 डिसेंबरनंतर बाईक-टॅक्सी बंद नाही झाली तर पुन्हा आंदोलन करणार आहे.
– किशोर चिंतामणी, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना रिक्षा युनिट
प्रवासी, विद्यार्थ्यांचे हाल
शहरात सोमवारी रिक्षा संघटनांनी आरटीओ कार्यालयसमोर ठिय्या आंदोलन करून बेमुदत बंद सुरू केल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. काही ठिकाणी प्रवाशांकडून जास्तीचे भाडे आकारणे, रिक्षा फोडणे, रॅपिडो चालकांना मारहाण करण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे या बंदचा सर्वाधिक मनस्ताप नागरिकांनाच सहन करावा लागला आहे.
रिक्षा बंदचा सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थी, जेष्ठ नागरिक आणि रुग्णांना बसला. विद्यार्थ्यांनी रिक्षा बंद असल्यामुळे पीएमपी बसचा आधार घेतला; पण सकाळी पीएमपी बसमध्ये गर्दी असल्यामुळे लहान मुलांचे प्रचंड हाल झाले. तसेच परराज्यातून आणि जिल्ह्यातून रेल्वेने आलेल्या नागरिकांना रेल्वे स्थानकावर रिक्षा आणि कॅब नसल्यामुळे तासन तास ताटकळत उभे राहवे लागले. ओला आणि उबेर रिक्षाचालकांनी देखील बंदमध्ये सहभाग घेतल्यामुळे प्रवाशांना खासगी कॅबशिवाय पर्याय नव्हता; पण आज कॅबला देखील जास्त मागणी असल्यामुळे कॅब देखील उपलब्ध होत नव्हत्या.
या आंदोलनातून काही रिक्षा संघटनांनी माघार घेतली होती; पण रिक्षाचालकांना दमदाटी करून रिक्षा फोडल्याच्या घटना घडल्या. तर काही ठिकाणी प्रवाशांना रिक्षातून उतरवून देण्यात आल्याच्या घटना घडल्या.
मी नियमित तपासणीसाठी हॉस्पिटलला जाण्यासाठी बाहेर पडलो. पण आज रिक्षा नसल्यामुळे मला कॅब बुक करावी लागली. नेहमी 120 ते 140 रुपयांमध्ये हॉस्पिटलला जातो; पण आज मला 250 रुपये द्यावे लागले.
-प्रशांत देशपांडे, प्रवासी