रमेश जाधव
रांजणी (पुणे) – चालू बर्षी खरीप हंगामात पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बाजरीचे पीक घेतले आहे. मात्र, पीक काढणीला वेग आला असला तरी पावसाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे बाजरी उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवाला घोर लागला आहे. सध्या परतीचा पाऊस सर्वत्रच सुरू आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असल्याने खरिपातील बाजरी पिकाला मोठ्या प्रमाणात धोका संभवत आहे.
पुणे जिल्ह्याचा विचार करता खरीप हंगामात सुमारे दोन ते तीन हजार हेक्टर क्षेत्रावर बाजरीचे पीक घेतले जाते. यंदा बाजरी पिकाने जिल्ह्यात सरासरी गाठली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बाजरीचे क्षेत्र वाढले आहे. यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस झाला, तरी दरवर्षीच्या तुलनेत यंदा बाजरीची एक महिना आधीच पेरणी झाली. सध्या शेती जोमात आहे आता बहुतांश भागात बाजरीच्या काढणीला सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात कुठे ना कुठे जोरदार पावसाची हजेरी लागते आहे. ऐन बाजरी काढणीच्या काळात पाऊस सुरू झाला असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
- कणसे सुरक्षित ठिकाणी नेण्यावर भर
बाजरीची काढणी करून ती काही काळ शेतात घेतल्यानंतरच त्याची बुचडे लावण्याची परंपरा आहे. गेल्या वर्षी झालेल्या नुकसानीमुळे यंदा अनेक शेतकऱ्यांनी त्यामध्ये बदल केला असून, बाजरी काढणीनंतर कणसांची छाटणी करून सुरक्षित ठेवण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये 15 ते 20 दिवस पाऊस सुरू राहिल्याने बाजरी काढणीला आलेली आणि काढणी केलेल्या बाजरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. यंदा सतत पाऊस पडत असल्याने तो बाजरीसाठी धोकादायक ठरू शकतो, त्यामुळे खरिपाची पेरणी केलेली बाजरी पावसामुळे वाया जाते की काय, अशी भीती शेतकरी वर्गात आहे.
गेल्या वर्षी पावसाने बाजरीचे मोठे नुकसान झाले होते. चालू वर्षी बाजरीचे पीक चांगले आले आहे; परंतु परतीचा पाऊस सतत होत असल्याने बाजरीचे नुकसान होण्याची भीती आहे. सध्या पिकाची काढणी करत असलेले शेतकरी या पावसामुळे चिंतेत आहेत.
– संदेश थोरात, बाजरी उत्पादक शेतकरी, रांजणी