पुणे- केंद्र सरकार लवकरच “डिजिटल आरोग्य अभियान’ सुरू करणार असून, यामुळे भारतातील सर्व नागरिकांना एक आरोग्य ओळखपत्र मिळेल. ज्यामध्ये नागरिकांचे तपशील उपलब्ध असतील. आरोग्य, शिक्षण आणि पोषण यावर एक विशिष्ट बजेटदेखील आखण्यात येणार आहे, अशी माहिती नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी दिली.
सिम्बायोसिसच्या सुवर्णमहोत्सवी व्याख्यानमालेंतर्गत अमिताभ कांत यांनी “नव्या भारताचे निर्माण’ या विषयावर मार्गदर्शन केले.
कांत म्हणाले, ‘करोनाचे संकट जगभर पसरले आहे. त्यामुळे आज कृत्रिम बुद्धीमत्तेसह देशाच्या यश आणि विकासासाठी आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर अनिवार्य झाला आहे. या साथीच्या संकटाला संधीमध्ये रुपांतरित करणारा भारत हा जगातील सर्वांत तरुण देश आहे.
आरोग्य सेवा आणि अन्य क्षेत्रातील आव्हानांचा सामना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करणे शक्य आहे. भारत एक पॉवर हाऊस असून, कृत्रिम बुद्धिमत्ता ही पॉवर हाऊसची वाहक असल्याने डेटा वैज्ञानिक आणि उत्पादन व्यवस्थापक यांना महत्त्व आहे,’ असे देखील कांत यांनी नमूद केले.
पुण्याच्या एसआयबीएमचे संचालक डॉ. रामकृष्णन रमण यांनी व्याख्यानाचे नियंत्रक म्हणून काम केले. तर एसआययूच्या कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते यांनी आभार मानले.