पिंपरी – उद्योजकांकडून गेल्या पाच वर्षांपासून पाठपुरावा करूनही औद्योगिक परिसरात घातक कचऱ्याची विल्हेवाट करण्यासाठी स्वतंत्र प्रकल्प उभारण्यात आला नाही. याउलट रांजणगावच्या खासगी कंपनीकडे कचरा पाठवा, असा अजब सल्ला महापालिकेचे संबंधीत अधिकारी उद्योजकांना देत आहेत. त्यासाठी उद्योजकांना पैसे मोजावे लागणार आहेत. महापालिकेने खासगी कंपनी पोसण्याचा घाट घातल्याचे आरोप उद्योजकांमधून होत आहे. महापालिकेच्या या उदासिनतेमुळे औद्योगिक परिसरातील घातक कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न रेंगाळला असून त्यामुळे कामगारांसह परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात 11 हजारांपेक्षा अधिक कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात घातक कचऱ्याची निर्मिती होते. औद्योगिक परिसरातून सुमारे 15 टक्के घातक कचऱ्याची निर्मिती होत असल्याचे सांगितले जात आहे. भोसरी, कुदळवाडी, चिखली भागात याचे प्रमाण मोठे आहे. हा कचरा महापालिकेकडून उचलला जात नाही. त्यामुळे त्याची विल्हेवाट कशी लावायची याची चिंता उद्योजकांना आहे. औद्योगिक परिसरात रस्त्याकडेलाच घातक कचरा टाकला जात आहे. परिणामी त्यामुळे कामगारांना, परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे.
घातक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने स्वतंत्र प्रकल्प उभारणे गरजेचे आहे. यासाठी पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटनेकडून सातत्याने पाठपुरावा देखील सुरू आहे. मात्र, त्याला महापालिका प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. या उलट रांजणगाव येथील एका खासगी कंपनीकडे कचरा पाठवा, असा सल्ला महापालिका देत आहे. त्यासाठी या कंपनीला पैसे मोजावे लागणार आहेत. उद्योजकांच्या खिशाला कात्री लावण्याचे आणि खासगी कंपनीला पोसण्याचा घाट घातला जात असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.
एमआयडी परिसरातील कंपन्यांमधून निर्माण होणाऱ्या घातक कचऱ्याची समस्या संपेना झाली आहे. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्पाची निर्मिती करण्याची गरज आहे. त्यासाठी महापालिकेकडे पाच वर्षांपासून पाठपुरावा करत आहे. मात्र, सकारात्मक पाऊल टाकले जात नाही. रांजणगाव येथील कंपनीकडे कचरा पाठविण्यास सांगितले जात आहे.
– संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटना.
घातक कचरा म्हणजे काय?
सजीवांना हानिकारक ठरणाऱ्या कचऱ्याला घातक कचरा म्हटले जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील औद्योगिक वसाहतीमध्ये कार्यरत असलेल्या बहुतांश कंपन्यांमध्ये घातक कचऱ्याची निर्मिती होते. यामध्ये रसायने, कीटकनाशके, जंतुनाशके, रंगाचे डबे, ऑईल, हॅण्डग्लोज, फिनेल, ग्रीसचे डबे आदी गोष्टींचा समावेश होत आहे.
केवळ एक बैठक
घातक कचऱ्याची विल्हेवाट कशी आणि कुठे लावायची या बाबत उद्योजक, महापालिका अधिकारी यांच्यामध्ये आतापर्यंत केवळ एकच बैठक घेण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून वारंवार पाठपुरावा करूनही त्यानंतर बैठक घेण्यात आलेली नाही. पहिल्या बैठकीत देखील कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. महापालिकेच्या या उदासिन धोरबद्दल उद्योजकांमधून तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त होत आहे.