प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 7 -करोना काळात विद्यार्थी आणि शिक्षकांवर जी परिस्थिती ओढावली होती, ती सर्वांसाठीच अत्यंत कठीण होती. त्या काळापासून विद्यार्थांकडून सोशल माध्यमांचा अतिवापर होऊ लागला. सोशल माध्यमांचा वापर नव्या वाटा शोधण्यासाठी करण्याची आवश्यकता आहे, असे मत महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा रेखा पळशीकर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी, हुजूरपागाच्या लक्ष्मी रस्त्यावरील शोभाताई रसिकलाल धारिवाल इंग्रजी माध्यम शाळा व हुजूरपागा इंग्रजी माध्यम ज्युनिअर कॉलेजच्या वतीने इयत्ता दहावी आणि बारावीच्या यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात त्या बोलत होत्या.
यावेळी संस्थेच्या मुख्य विश्वस्त उषा वाघ, सचिव वरदेंद्र कट्टी, शाला समिती अध्यक्ष वर्षा गजेंद्रगडकर, सभासद रमाकांत सोनवणी, माजी मुख्य विश्वस्त जयश्री बापट, प्राचार्या अर्पिता कुलकर्णी, कीर्ती पंडित, प्रियदर्शनी पुरोहित, पूर्व प्राथमिक समन्वयक सवीता अंकइकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी यशस्वी विद्यार्थिनींना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.