कर्जत – कार्यारंभ आदेश देऊन 3 महिने उलटले असतानाही काम सुरू झाले नसल्याने विरोधकांनी दबावतंत्राचे राजकारण थांबवावे असे आवाहन करत मागील दाराने येऊन कोणी दबावाचे राजकारण करत आपल्या राजकीय स्वार्थासाठी जनतेच्या हक्काचं पाणी रोखत असेल तर आम्ही अशाच्या तोंडचं पाणी पळवल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत आ. रोहित पवार यांनी विरोधकांवर तोफ डागली आहे.
मिरजगावच्या पाणीपुरवठा योजनेच्या नुकत्याच सुरू झालेल्या कामाच्या पाहणीप्रसंगी ते बोलत होते. पाण्याअभावी कर्जत-जामखेड मतदारसंघातील महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतो असे आमदार होण्यापूर्वी रोहित पवार यांना समजल्यानंतर त्यांनी प्रत्येक गावातील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्याचा शब्द आ. पवार यांनी निवडणुकीत दिला होता. त्यानुसार आ. पवार यांनी जलजीवन मिशन योजनेंतर्गत मतदारसंघातील सर्व गावांचा समावेशदेखील करून घेतला.
आमदार झाल्यानंतर पवार यांनी मतदारसंघात कोट्यवधींची पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली आणि त्यासाठी लागणारा आवश्यक तो सर्व पाठपुरावा देखील शासनदरबारी त्यांनी केला हे सर्वश्रुत आहे. नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आणि कार्यारंभ आदेशही तीन महिन्यांपूर्वी निघाले; पण अजूनही कोंभळीसह 12 गावे, मिरजगाव आणि खर्डा येथील जनता तहानलेलीच आहे. कारण कार्यारंभ आदेश निघून 3 महिने झाले, तरी प्रत्यक्षात काम मात्र सुरू नव्हते. याबाबत शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि संबंधित विभागाकडे आ. पवार यांनी पाठपुरावा केल्यामुळे नुकतेच मिरजगाव येथील काम सुरू करण्यात आले आहे. कोंभळी येथे पाईपदेखील आणण्यात आले आहेत. या कामाची आ. पवार यांनी काल (शुक्रवार) पाहणी केली.
आ. पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील पाण्याची गंभीर समस्या सोडवण्यासाठी कोट्यवधींची पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली. त्यासाठी लागणारा आवश्यक तो सर्व पाठपुरावादेखील शासनदरबारी त्यांनी केला. परंतु राजकीय फायद्यासाठी अधिकारी व कंत्राटदारांवर दबाव आणला जात असल्याने काम थांबले आणि त्याचा जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
मतदारसंघातील पाण्याची गरज लक्षात घेता लगेचच कामाला सुरुवात होणे गरजेचे होते. परंतु राजकीय फायद्यासाठी सत्तेचा गैरवापर करून दबावतंत्राचा वापर होत असेल, तर ते नक्कीच निंदनीय आणि विकासाला बाधा आणणारे आहे. परंतु आता मिरजगावचे काम सुरू झाले आहे आणि या प्रमाणेच जनतेच्या हक्काचे पाणी त्यांना मिळावे यासाठी आ. पवार प्रयत्नशील आहेत.
नकारात्मकतेचं आणि द्वेषाचं राजकारण जर काही लोकांनी केलं आणि त्यामुळे विकासाला बाधा आली, तर मतदारसंघातील जनता शांत बसणार नाही. तसेच मिरजगाव व कोंभळी येथील कामांना गती सध्या गती देण्याची गरज असून, खर्डा येथील कामदेखील लवकरात लवकर सुरू होण्यासाठी अधिकारी आणि मंत्र्यांबरोबर चर्चा केली आहे व वैयक्तिक पातळीवर याकडे लक्ष आहे.
– आ. रोहित पवार