त्या दिवशी डॉक्टर दुपारीच घरी आले. “सुमे, आज यथेच्छ आणि पोटभर जेवलो बघ. आता जरा वामकुक्षी घेईल म्हणतो.’ असं म्हणत डॉक्टर बेडवर आडवे झाले. “शशी आला का कॉलेजातून?’ “कधीच आलीय स्वारी. वरच्या रूममध्ये मित्रांबरोबर तालीम चालू आहे. कॉलेजमध्ये नाटक बसवतायत.’ “काय? नाटक!’ अंगावर ओढून घेतलेले पांघरूण झटकून देत डॉक्टर ताडक्न बेडरूमच्या बाहेर आले. “थांब. आलोच मी वर जाऊन.’ “झालं, आता हे महाशय वामकुक्षी विसरले!’
“नाट्यमंडळी आत येऊ का?’ “बाबा आज तुम्ही घरी!’ “हो, आलो आज लवकर. नाटकाची तालीम चालू आहे कळलं. म्हटल बघू तरी कशी रंगलीय तालीम.’ शशी आणि त्याचे मित्र गंभीर होऊन एकमेकांकडे पाहू लागले. “बाबा, आम्हाला नाही वाटत आम्ही नाटक करू शकू.’ शशीच्या पडलेल्या चेहऱ्याकडे पाहत, “काय झाले?’ आणि मला आधी हे सांग कोणतं नाटक बसवताय?’ “अंकल, मीच लिहिलंय “हसरा कट्टा’. वृद्धापकाळातील आयुष्यावर भाष्य करणारं. थोडंसं हलकंफुलकं आणि काहीसं भावनिक.’ अंजली डॉक्टरांना सांगत होती. “बर, मग अडचण काय आहे?’ “बाबा, मी सांगतो. आम्हाला त्या वृद्ध भूमिकेत शिरताच येत नाही.’ “अंजली, बघू तू काय लिहिलंस.’ काही वेळाने, “व्वा! काय सुंदर लिहिलंस. अंजली, तुझ्या घरी कोण कोण असतं?’ “मी आणि आई-बाबा.’ “आणि आजी-आजोबा?’ “माझे आई-बाबा दोघेही अनाथाश्रमात वाढले, म्हणून…’ “ओह. आय एम एक्सट्रेमली सॉरी.’ डॉक्टरांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. “मुलांनो, नाटक करताना ते पात्र काही वेळ का होईना जगायचं असतं. लिहिताना जसं अंजलीने तिच्या नसलेल्या आजी-आजोबांना पुन्हा जिवंत केलं ना, अगदी तसंच! त्या पात्रावर लिहिलेले सुखाचे क्षण हे क्षणभर त्याचे नसून तुमच्या वाटेला आलेले असतात. ते तुम्हाला स्टेजवर प्रेक्षकांसमोर हसून व्यक्त करावेच लागतात. स्टेजवर काही सेकंद येण्याआधी तुमच्या आयुष्यात घडलेल्या दुःखाला बाजूला सारून, त्या “मेरा नाम जोकर’ मधील सर्कशीतल्या राजू सारखं तुम्हाला प्रेक्षकांना हसवावंच लागतं! “अँड शो मस्ट गो ऑन’ म्हणत रंगमंच मात्र जिवंत ठेवावाच लागतो! आणि दुःख म्हणाल तर, या जगात काही कमी नाही. नाही म्हटल तरी, भूतकाळातल्या कडवट क्षणाला घशाखाली गिळून घेत डोळ्यावाटे अश्रू गाळावेच लागतात. एका क्षणात कलाकाराच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहतात तर दुसऱ्याच क्षणात त्याच डोळ्यातून दुःखाश्रू आणि ते पाहत असताना समोर बसलेल्या प्रेक्षकांच्या डोळ्यात जे दाटून येतं ना, ते शब्दात नाही सांगता येतं. पण त्यांच्या डोळ्यात पाहायचं साधं भाग्य नसतं त्या कलाकाराचं! का? तर त्याला नाटक संपेपर्यंत फक्त आणि फक्त त्या पात्राशीच हितगुज करायच असतं. त्याला स्वतःला विचलित होऊ द्यायचं नसतं, बस्स एवढंच.
तिसरी घंटा झाली की, वर जाणारा पडदा हा काही फक्त त्या कलाकाराचेच नाही तर प्रेक्षकांचे सुद्धा हृदयाचे ठोके वाढवत असतो! त्या दोघांच्यामध्ये आता कुठलाही आडपडदा नसतो. जे काही असतं ते साफ, तेवढच नितळ आणि जिवंत! कलाकार, त्या “पात्राचं’ आणि प्रेक्षक कधी “स्वतःच’ तर कधी “दुसऱ्याचं’ आयुष्य घटकाभर का होईना जगून घेतात. त्याच्या अभिनयाला दाद देताना प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं नाट्यगृह टाळ्यांनी दुमदुमून जातं. पण रंगमंचावर उभ्या असलेला नटाला ऐकू येतो, तो फक्त त्याच्या आतल्या पात्राचाच आवाज! नाटक संपताच पडदा पडतो. क्षणाक्षणाला लागून राहिलेली उत्कंठा संपते पण रंगमंचावर उभं केलेलं पात्र प्रेक्षकांच्या नसानसात असं काही भिनतं की, त्यांच्या एका डोळ्यात “आसू’ तर दुसऱ्या डोळ्यात “हसू’ घेऊन ते जाऊ लागतात. उभे राहून पुन्हा तेवढ्याच जोशात टाळ्यांचा कडकडाट करतात आणि हा कलाकार त्याने भारावून जातो. विनम्र होऊन त्यांना हात जोडतो. त्यांच्यासमोर नतमस्तक होतो आणि गर्दीत त्याची नजर “त्या’ पात्राला शोधत राहते, ज्याने त्याला हे जग जिंकून दिलेलं असतं! तुम्हाला एक सांगू, नाटकातलं पात्र आभासी कधीच नसतं. ते पण एक वास्तवच असतं आणि एक नट म्हणून त्या पात्राच्या आत तुम्ही नाही, तर त्या पात्राला तुमच्या आत सामावून घ्यायचं असतं!
डॉक्टरांचं बोलणं ऐकून रूममध्ये एकच टाळ्यांचा आवाज झाला. इतक्यात शशीची आई रूममध्ये आली. “चला, गरमागरम चहा घ्या.’ “आई, बाबा कधी नाटकात काम करायचे का गं?’ शशीची आई डॉक्टरांकडे पाहून हसू लागली. “काम नाही पण कॉलेजात एकत्र असताना आम्ही नाटकं खूप पाहायचो. लग्न झाल्यानंतर तू पोटात असताना सुद्धा नाटक पाहायचं काही सोडलं नाही!’ “बाबा आज जाऊ या का आपण सगळेजण नाटकाला?’ “हो अंकल, आम्हाला पण तुमच्याबरोबर नाटक पाहायला आवडेल.’ “सुमे, प्लॅन एकदम झकास जमलाय. जाऊ या.’ “बाबा मी आत्ताच ऑनलाइन तिकीट बुक करतो.’ “नाही, आपण दोघे तिथे जाऊन बुक करू. खिडकीतून हात घालून तिकीट बुक करण्यात आणि “जरा पुढचं सीट बघा ना मिळतंय का?’ अशी घासाघीस घालण्यातली मजा काही औरच! सुमे, आम्ही आलोच जाऊन. आणि तू ती मोरपंखी कलरची साडी घाल आणि अंबाडा बांध. येताना मी मोगऱ्याचा गजरा आणतो.’ डॉक्टर बोलले ते खरंय अगदी. “नाटक म्हणजे’ एक “कुटुंब’ आणि मराठी माणसाचा “आत्मा’!
अमोल भालेराव