कलावंत, साहित्यिक, गायक-चित्रकार किंवा जाण असलेला प्रत्येक माणूस एका गोपाळाच्या शोधात असतो. गोपाळ हे काही धर्मातलं विशेषनाम नाही तर प्रत्येकाचं स्वतःचं खास असं वैशिष्ट्य? देवानं प्रत्येकाला वेगळं केलेलं आहे. प्रेमळ, प्रामाणिक, हुशार, कष्टाळू, व्यवहारी चतुर, खिलाडूवृत्तीचा, विनोदी कितीतरी गुणांनी भरलेला पण त्याच्यासारखा तोच!
संत रामदास रामाच्या, कविराज मंगेश पाडगावकर विठ्ठलातील “ठ्ठ’च्या तर मी गोपाळाच्या शोधात आहे. नावं कोणतीही द्या. त्यानं फरक नाही पडत. आपणच जातीधर्माचे, पंथसंप्रदायाचे अडथळे माणुसकीच्या मार्गात मध्येच दगडासारखे आणले आहेत. कदाचित कोणी येशूच्या शोधात असेल, कोणी शिवाजी महाराजांच्या, कोणी आंबेडकरांच्या, कोणी बुद्धांच्या! पण सगळ्याच महामानव झालेल्या व्यक्तीला केवळ व्यक्ती नाहीत तर ती सत्याची, धाडसाची, प्रामाणिकपणाची, न्यायाची प्रतीकं आहेत. आपण माणसं मात्र त्यांचे पुतळे, चित्र आणि जयजयकारात अडकून पडतो आहोत. पण त्यांनी जे गुण आयुष्यात जोपासले, मोठे केले, ज्यासाठी आणि ज्यामुळे ते जगले ते गुण आत्मसात केले तरच तो शोध पूर्ण होणार आहे.
फार पूर्वी मी “अलगूज’ नावाची कथा एका दिवाळी अंकासाठी लिहिली होती. त्यातील नायक राजपुत्र असूनही अलगूज वाजवतो. त्यातच तो रमतो. त्या अलगुजाच्या स्वरांनी प्राणी, पक्षी, वृक्षही तल्लीन होतात. तिथंच त्याला प्रेयसी भेटते. पण तिचे वडील त्यांचे प्रेम नाकारतात, तिला बंदिवासात ठेवतात. मग राजपुत्र त्याचा मित्र गोपाळ (विदूषक) याला घेऊन तिला सोडवतो. पण दुर्दैवानं त्या धुमश्चक्रीत गोपाळ मात्र मृत्युमुखी पडतो.
त्यातलं एक वाक्य मी जीव तोडून लिहिलं होतं. ते शब्द वास्तवाच्या आगीतून जळत बाहेर आले आहेत. गोपाळ म्हणतो, “त्यांना राजपुत्र कळतो फक्त कलावंत नाही समजत, जवळचा असला तरीही आता सांगायलाच हवं त्यांना त्यांच्याच भाषेत.’
या इथं राजपुत्र हे कलाकाराचं तर गोपाळ हे सामान्य माणसाचं प्रतीक आहे. सामान्य, व्यवहारी माणसांमुळेच कलाकार काम करू शकतो. पण कलासुद्धा मनाची भूक भागवते, माणसाला प्रगल्भ करते, आयुष्य रंगीत करत विचार करायला भाग पाडते.
प्रत्येकजण काही कवी, वादक, चित्रकार, गायक, लेखक होऊ शकत नाही. ते नुसतं कल्पनेत रमणं नसतं. ती पूर्ण नवनिर्मिती असते. जमीन जाळली, नांगरली की मग बीज रुजतं तसंच विव्हलता, कातरता, वास्तवाचे चटके, वियोग, मनाला झालेल्या जखमा या परिस्थितीच्या वारंवार आघातानंतर कला जन्मते, त्यानंतर ती रसिकाला भिडते, त्यावर चर्चा होतात, त्यातून दुसरी कृती जन्मते. प्रत्येक सामान्य माणसाला कलाकार होणं जमणार नाही. तसं प्रत्येक कलाकाराला चिरंजीव होणं शक्य नाही. केशवसूत म्हणाले होते की, “कविता (म्हणजे कोणतीही कला) ही आकाशाची वीज आहे. ती धरू पाहणारे शेकडा नव्याण्णव टक्के कवी जळून जातात.’ पण प्रत्येक कलाकाराचा ध्यास तर अमर होण्याचा असतो. रसिकांना ताजीतवानी, सुगंधी फुलं देण्याचा असतो आणि गोपाळाचा शोध घेत राहिलं तर ते कधी सत्यात उतरतं हे त्यालाही समजत नाही. परिस्थितीत ओढलेला प्रत्येक ओरखडा त्यावेळी सोनेरी, सुगंधित आणि मखमली होतो.
अर्थात, खरा कलावंत परत गोपाळाच्या शोधात बाहेर पडतो. नव्या जखमा, नवे अपमान सोसतो, आपल्याला वाटतं ते शब्दांतून, चित्रातून, गाण्यात, नृत्यात (आणि इतर अनेक प्रकारात) परत परत मांडतो. स्वतःचा शोध घेतो. कदाचित ते कोणाला आवडतं, कोणाला नाही आवडत पण त्याचं कलेवरचं प्रेम त्यामुळं कमी तर होत नाही आणि थांबत तर मुळीच नाही. आशा-निराशा, यशापयश, स्तुती-निंदा हे सगळं अंगावर झेलत, अभिमानानं मिरवत त्याचा गोपाळाचा शोध सुरूच राहतो.
श्रीनिवास शारंगपाणी