नवी दिल्ली – जून महिन्यामध्ये किरकोळ महागाईचा दर 6.26 टक्क्यांपर्यंत वाढल्यामुळे निराशेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र ही महागाई जुलै महिन्यामध्ये कमी होऊन 5.59 टक्के इतके नोंदली गेली आहे.
त्यामुळे आगामी काळातही ही मागणी कमी होण्याची शक्यता वाढली आहे. महागाईचा दर उच्च पातळीवर असूनही गेल्या पंधरवड्यात रिझर्व्ह बॅंकेने जाहीर केलेल्या पत धोरणांमध्ये व्याजदर कमी पातळीवर ठेवले होते आणि महागाई वाढणार नाही अशी आशा व्यक्त करण्यात आली होती.
अन्नधान्याच्या किमती या काळात कमी झाल्यामुळे एकूणच महागाई कमी होण्यास मदत झाली असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. किरकोळ महागाईचा दर चार टक्क्यांच्या आत रोखण्याचा संकल्प केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेने जाहीर केला आहे. मात्र सध्या ही महागाई त्यापेक्षा थोडी जास्त आहे. मात्र तरीही अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने कर्जावरील व्याजदर कमी पातळीवर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
डिसेंबर महिन्यापर्यंत तरी या व्याजदरात वाढ केली जाणार नाही असे अनेकांना वाटते. या वर्षी पूर्ण भारतामध्ये चांगला पाऊस पडला आहे. त्याचबरोबर अन्नधान्याचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. निर्बंध कमी झाल्यामुळे वाहतुकीत अडथळे कमी होत आहेत. त्यामुळे आगामी काळात महागाई वाढणार नाही असे बऱ्याच विश्लेषकांना वाटते. आजच्या आकडेवारीमुळे त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.