सातारा – करोनाच्या संकटामुळे गेले 57 दिवस थांबलेली एसटीची चाके अखेर शुक्रवारी फिरली; परंतु लालपरीला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळाल्याने दिवसभरात दहा फेऱ्यांमध्ये केवळ पन्नास प्रवाशांची ने-आण करण्यात आल्याचे विभागीय नियंत्रक सागर पळसुले यांनी सांगितले. करोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर एसटीला जोरदार फटका बसला. दररोज अडीच लाख किलोमीटर अंतर धावणाऱ्या एसटी बसेसची चाके गेले 57 दिवस जागेवरच थांबली होती.
लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात शासनाने काही निर्बंध शिथिल करून एसटीला जिल्ह्यांतर्गत प्रवासी सेवा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. शासनाच्या निर्णयानुसार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यात एसटी बससेवा सुरू करण्याचा आदेश गुरुवारी जारी केला. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून शुक्रवारी बसफेऱ्या सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले; परंतु पहिल्या दिवशी या फेऱ्यांना अल्प प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे.
सातारा, कराड, पाटण, वाई, वडूज,महाबळेश्वर, खंडाळा, कोरेगाव, दहिवडी या आगारांमधून सुरू झालेल्या दहा बसफेऱ्यांना केवळ पन्नास प्रवासी मिळाले तर फलटण येथून साताऱ्याकडे येणाऱ्या बसमध्ये एकही प्रवासी न बसल्याने ती फेरी रद्द करावी लागली. एसटीकडून उद्या, दि. 23 पासून जिल्ह्यात 115 बसफेऱ्या सुरू केल्या जाणार आहेत. त्यामध्ये किमान वीस हजार किमी अंतरात लालपरी धावणार असल्याचे पळसुले यांनी सांगितले. बसफेऱ्या सुरू झाल्याचे जनतेला समजल्यावर चांगला प्रतिसाद मिळेल, या आशेवर जिल्ह्यातील महत्त्वाच्या बाजारपेठा व तालुक्याच्या ठिकाणावरून बसेस सोडण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
चाकरमान्यांचा एसटीला आधार
एसटीने जिल्ह्यांतर्गत बसफेऱ्या सुरू केल्या असल्या तरी त्यांना मिळणारा अल्प प्रतिसाद अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढवणारा आहे. जिल्ह्यातील सरकारी व खासगी कार्यालये सुरू झाल्याने सध्या तरी एसटीला त्यांचाच आधार असल्याचे चित्र आहे.