– सप, बसपासह आपचीही बैठकीला अनुपस्थिती
नवी दिल्ली: देशात करोनाने कहर केला असल्याने या संकटाला “राष्ट्रीय आपत्ती घोषित करत राज्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी करण्यासाठी केंद्रातील विरोधी पक्ष एकवटला आहे. या संकटकाळात नवी दिल्लीत पहिल्यांदाच विरोधी पक्षांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आज पार पडली. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात देशातील 22 पक्षांनी यात सहभाग घेतला. त्यातही सर्वात लक्षणीय उपस्थिती होती ती शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांची.
यानिमित्ताने कॉंग्रेसच्या बैठकीत शिवसेनेची उपस्थिती हा प्रकार राजकीय इतिहासात पहिल्यांदाच घडला आहे. महाराष्ट्रातल्या सत्तास्थापनेत शिवसेना-कॉंग्रेस एकत्रित आल्यानंतर आता राष्ट्रीय पातळीवर शिवसेना एनडीएकडून यूपीएकडे प्रवास करतेय का, असा प्रश्न चर्चिला जात आहे. या बैठकीला समाजवादी पक्ष, बसपा, आम आदमी पक्ष यांनी मात्र पाठ फिरवली.
या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडलेल्या बैठकीत कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपल्या भाषणात मोदी सरकारच्या लॉकडाऊनबद्दलच्या धोरणांबद्दल कडाडून हल्ला चढवला. याप्रसंगी माजी पंतप्रधान आणि जेडीएस नेते एच. डी. देवेगौडा, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, डीएमके नेते एम. के. स्टॅलिन, तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कॉंग्रेससह अनेक समविचारी पक्षांनी या संकटाच्या काळात गरिबांना आधार देण्यासाठी थेट मदतीची मागणी केली, पण केंद्राने याकडे कानाडोळा केला आहे. शिवाय मजुरांचे हाल होऊ नयेत यासाठी बसेस, रेल्वेला परवानगी देण्याची मागणी विरोधक सातत्याने करत आहेत, पण मोदी सरकारने त्याहीबाबत निर्णय वेळेवर न घेता त्यात गोंधळाची परिस्थिती निर्माण केल्याने मजुरांचे प्रचंड हाल झाले आहेत, असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.