राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची गेली 21 वर्षे अखंड वाटचाल सुरू आहे. या काळातील राष्ट्रवादीची सुरू असलेली घोडदौड, सत्ता समीकरणे, सर्वसामान्य, तळागाळातील लोकांशी असलेली नाळ आणि सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात घेतलेली आघाडी यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या 21 व्या वर्धापनदिनानिमित्त घेतलेला आढावा….
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी हा भारतीय राजकीय वर्तुळात अल्पावधीत अतिशय महत्त्वपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या मोजक्या राजकीय पक्षांपैकी एक पक्ष आहे. भारतीय राजकारणातील मातब्बर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली दि. 10 जून 1999 रोजी 13 व्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची स्थापना करण्यात आली. नेत्यांच्या कार्यक्षमतेमुळे कमी वेळात पक्षाने जनमत संपादन केले. पक्षाची चमकदार कामगिरी आणि जनमताचा कौल पाहून भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा बहाल केला. नव्या राजकीय पक्षांची स्थापना आणि त्यांच्या विकासाच्या इतिहासात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची वाटचाल आदर्श, अतुल्य आणि नवा पायंडा घालून देणारी ठरली आहे.
पक्षाची स्थापना झाल्यानंतर पहिल्या दोन महिन्यातच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना पक्षाला सामोरे जावे लागले. देशात आणि राज्यांच्या निरनिराळ्या भागांमध्ये पक्षाने आपले उमेदवार उभे केले. जनतेचा भक्कम आशीर्वाद मिळाला आणि राष्ट्रीय व राज्यपातळीवर एक समर्थ पक्ष म्हणून मान्यता मिळाली. केंद्राप्रमाणेच महाराष्ट्र आणि अन्य राज्यांमध्येही “राष्ट्रवादी’ राज्यांच्या सत्तेत सहभागी झाली. गोवा, नागालॅंड, मेघालय, मणिपूर, आसाम, गुजरात, केरळ, बिहार, ओरिसा, झारखंड, अरुणाचल या राज्यांमध्ये पक्षाला जनतेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.
21 वर्षांच्या प्रवासात निष्ठावान कार्यकर्ते आणि कर्तबगार नेत्यांच्या जोरावर केवळ शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागातल्या नागरिकांशीही नाते जोडले आहे. विविध राज्यांपासून केंद्रशासित प्रदेशांपर्यंत देशाच्या सर्वच भागात पक्षाने आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. अत्यंत अल्पावधीत निवडणूक आयोगाची राष्ट्रीय मान्यता मिळवून देशभर विस्तारलेला राष्ट्रवादी कॉंग्रेस हा देशातील पहिला व एकमेव पक्ष ठरला आहे.
स्वातंत्र्य, समता, बंधुता, सर्वधर्म समभाव, राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही आणि विकास या संकल्पनांवर दृढ विश्वास ठेवून पक्ष अखंडित व प्रवाहीपणे आपले काम करीत आला आहे.
अन्याय, अत्याचाराविरुद्ध प्रभावीपणे संघर्ष करून मागासवर्गीय, दलित, आदिवासी, भटके-विमुक्त, महिला, अपंग, वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी यांना त्यांचा न्याय्य हक्क मिळावा यासाठी धोरणे आखून त्यांच्या यशस्वी अंमलबजावणीचे काम पक्षाने समर्थपणे पार पाडले आहे. युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी “युवा धोरण’ जाहीर करून त्यांना सर्व क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. भविष्याचा वेध घेऊन त्यानुसार अविरत वाटचाल करणारा “राष्ट्रवादी’ हा देशातील एकमेव पक्ष आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारसाहेब हे केंद्रात कृषिमंत्री होते. त्यांनी महाराष्ट्राला दुष्काळ, अतिवृष्टी या नैसर्गिक संकटसमयी हजारो कोटी रुपये शेतकऱ्यांना मदत म्हणून वाटण्याकरिता उपलब्ध करून दिले. इतकेच नव्हे, तर राष्ट्रीय कृषी विकास योजना, एकात्मिक पाणलोट विकास, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, जलसंधारण, मेगाफूड पार्क, मत्स्योत्पादन, दुग्धविकास यासारख्या अनेक योजनांमधून शेतकऱ्यांना फळबागा, ग्रीनहाऊस, शेततळी, सूक्ष्मसिंचन, अन्नप्रक्रिया उद्योग, छोटी यंत्रसामग्री, प्री-कुलिंग चेंबर्स, वातानुकूलित वाहने, गोदामे, आधुनिक रायपनिंग चेंबर्स, बाजारांची उभारणी, कांदाचाळीसाठी अनुदान, शेतमालाच्या निर्यातीसाठी सबसिडी, मासेमारी, पशुपालन, दुग्धव्यवसाय यांसारख्या कितीतरी गोष्टी व त्याकरिता लागणारे अनुदान नवनवीन योजना सुरू करून उपलब्ध करून दिले.
42 वस्तूंच्या आधारभूत किंमतीत त्यांनी प्रचंड वाढ करून दिल्यामुळे लाखो कोटी रुपये शेतकऱ्यांच्या हातात पडू शकले. त्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते, हे कोणालाही विसरता येणार नाही. देशाच्या अन्नधान्य स्वयंपूर्णतेइतकीच शेतकऱ्यांची आर्थिक उन्नतीही महत्त्वाची आहे, हे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा शरद पवारसाहेब यांनी कृतीतून सिद्ध केले आणि गेली 50 वर्षे अनुत्तरित असलेल्या एका प्रश्नाचे उत्तर जाहीरपणे दिले आहे, त्यामुळे “शेतकऱ्यांचे प्रेषित’ याच भावनेतून लोक त्यांच्याकडे आज पाहत आहेत.
धर्मनिरपेक्ष आणि लोकशाहीवर आधारित समाजाची निर्मिती करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कटिबद्ध राहिली आहे. देशाची समता, सामाजिक न्याय, एकता आणि एकात्मतेचे रक्षण करण्यासाठी हे पक्ष वचनबद्ध आहे. रोजगार, निवारा, अन्न, शिक्षण, आरोग्याच्या अधिकाधिक उत्तम सुविधा देऊन देशातल्या सामान्य नागरिकांचे जीवन समृद्ध करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी प्रयत्नशील आहे.
रोजगाराच्या संधी निर्माण केल्यास आणि उद्योजकतेला प्रोत्साहन दिल्यास देशाच्या स्थायी अर्थिक विकासाला हातभार लागेल आणि त्याचा लाभ समाजाच्या दुर्बळ घटकांना होईल, यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा दृढ विश्वास आहे. राज्यघटनेच्या प्रस्तावनेत नमूद केल्याप्रमाणे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, प्रजासत्ताक लोकशाहीची स्थापना करणे, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेच्या माध्यमातून नागरिकांचा सन्मान आणि देशाची एकता जपणे ही पक्षाची आधारभूत तत्त्वे आहेत. कोणत्याही भेदांशिवाय, पूर्वग्रहांशिवाय विविध धर्मांच्या अनुयायांमध्ये असलेला बंधुभाव, एकमेकांच्या धर्मांचा आदर, परस्पर सहकार्य आणि सलोखा म्हणजे धर्मनिरपेक्षता या सुत्रावर राष्ट्रवादीची वाटचाल सुरू आहे.
समता आणि सामाजिक न्याय म्हणजे समाजातल्या उपेक्षित घटकांसाठी विशेष सकारात्मक पावले उचलणे आणि जीवनाच्या विविध क्षेत्रांत मुख्यत्वे शिक्षण आणि कौशल्य विकासात समान संधी मिळवून देणे. धार्मिक, जातीय, सामाजिक, प्रादेशिक, लिंगाधारित किंवा सामाजिक स्थानावर आधारित कोणतेही भेद न करता कायद्याचे राज्य आणणे, हे या पक्षाचे ध्येय राहिले आहे. देशाची एकता आणि अखंडता कायम राखण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी नेहमीच बांधिल राहिली आहे. शांततेच्या माध्यमातून सर्वसमावेशक विकास साधणे या विकासाच्या व्याख्येवर राष्ट्रवादीची आजपर्यंतची वाटचाल आहे. या वाटचालीस वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा….!
पराग शेणोलकर, कराड