नवी दिल्ली, – सुधारणांचा भाग म्हणून केंद्र सरकारने तीन कृषीविषयक कायदे आणले आहेत. ते शेतकऱ्यांच्याच हिताचे असले तरी त्याची कोणतीही सक्ती शेतकऱ्यांवर लागू नाही. या कायद्यांद्वारे शेतकऱ्यांपुढे आम्ही एक नवीन पर्याय उपलब्ध करून दिला आहे. जुनी व्यवस्था कायम ठेवून नवीन पर्याय शेतकऱ्यांपुढे उपलब्ध करून दिला तर त्यात आम्ही काय चूक केली आहे असा सवाल करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना कृषी कायद्यांचे पुन्हा एकदा समर्थन केले आहे.
ते म्हणाले की जुने काहींच बदलायचे नाही अशा भूमिकेत राहून आता चालणार नाही. सर्वच क्षेत्रात सुधारणांची गरज असून याच सुधारणांचा भाग म्हणून आम्ही हे कायदे आणले आहेत. पंतप्रधान म्हणाले की सध्या एक नवीनच प्रचार सुरू आहे तो म्हणजे जे कायदे आम्ही मागितलेच नाही ते कायदे आमच्यावर का थोपवले जात आहेत असा प्रश्न उपस्थित करून कृषी कायद्यांना विरोध केला जात आहे. पण कोणत्याही बाबतीत लोकांकडून मागणी होईपर्यंत सरकारने वाट बघत बसणे हे चांगल्या लोकशाहीचे लक्षण मानले जात नाही. आमच्या सरकारने अशा अनेक गोष्टी केल्या आहेत ती ज्याची कधी कोणी मागणीच केलेली नव्हती. ट्रिपल तलाक रद्द करणारा कायदा आम्ही आणला, त्याची मागणी कधी कोणी केली होंती?, मुलींच्या लग्नाच्या वयाच्या संबंधात, त्यांना वडिलोपार्िर्जत मालमत्तेत अधिकार देण्याच्या संबंधात आम्ही कायदे आणले त्याची कोणी मागणी केली होती. मुळात लोकांची मागणी होईपर्यंत सरकारने वाट बघत बसणे हेच चूक आहे असे ते म्हणाले. नवीन कृषी कायद्यांनी शेतकऱ्यांचा सर्वार्थाने लाभ होणार आहे. त्यांना नवीन मार्केट उपलब्ध होणार आहे पण त्याच वेळी त्यांची जुनी व्यवस्थाही कायम राहणार आहे. ज्यांना ही नवी व्यवस्था नको असेल तर त्यांना जुनापर्यायही आम्ही खुला ठेवला आहे.
आंदोलनकर्त्यांना खोटी माहिती देऊन आणि त्यांची दिशाभुल करून त्यांना सरकारच्या विरोधात उभे केले जात आहे असा आरोपहीं त्यांनी केला. या बाबतीत त्यांनी कॉंग्रेसला दूषणे दिली. मोदी म्हणाले की देशात वाढत्या लोकसंख्येमुळे जमीनीचे अनेक तुकडे होत आहेत आणि त्यामुळे छोट्या शेतकऱ्यांची संख्या वेगाने वाढली आहे. या छोट्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य देण्याचे काम या कायद्यांमुळे होणार आहे असे सांगत त्यांनी कृषी कायद्यांचे जोरदार समर्थन केले.
पवारांनीही केली होती सूचना
यावेळी बोलताना मोदींनी माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्याही काहीं वक्तव्यांचा दाखला दिला. कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या व्यतिरीक्त शेतकऱ्यांना नवीन पर्याय देण्याची व नव्या खासगी मंडया सुरू करण्याची सूचना शरद पवार यांनीही दिली होती असा दाखलाही त्यांनी दिला. या भाषणात मोदींनी कॉंग्रेसवरही चांगलेच शरसंधान साधले. ते म्हणाले की या पक्षाचे राज्यसभेतील सदस्य एक भूमिका घेतात आणि त्याच विषयावर कॉंग्रेसचे लोकसभेतील सदस्य वेगळी भूमिका घेतात. त्यामुळे कॉंग्रेसची आजची अवस्था विभाजीत आणि गोंधळलेला पक्ष अशी झाली आहे असा आरोपही मोदींनी केला. या भाषणात विरोधी पक्षांच्या सदस्यांनी वारंवार घोषणाबाजी करून अडथळे आणले. अखेरीच कॉंग्रेससह अन्य पक्षांनी त्यांच्या भाषणावर बहिष्कारही घातला.
पवित्र आंदोलन अपवित्र करण्याचा प्रयत्न
पंतप्रधानांनी आज आपल्या भाषणात आंदोलन करणारे आणि आंदोलनावर जगणारे या मधील फरक अधिक स्पष्ट करून सांगितला. पंतप्रधानांनी राज्यसभेत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आंदोलनजीवी असे संबोधले होते त्यावरून त्यांच्यावर देशभरातून चौफेर टीका होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदी म्हणाले की रास्त मागण्यांसाठी लोकशाहीं मार्गाने केलेले कोणतेही आंदोलन पवित्रच असते. दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेले हे आंदोलनही पवित्रच आहे. पण या आंदोलनाला अपवित्र केले जात आहे. त्यासाठी काही आंदोलनजीवी प्रयत्नशील आहेत. आंदोलनकर्ते आणि स्वत:च्या स्वार्थासाठी आंदोलनावर जगणारे आंदोलनजीवी यात फरक केला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले की आज जे लोक दहशतवादाच्या आरोपाखाली किंवा नक्षलवादी कारवायांच्या आरोपाखाली कारागृहात आहेत त्यांचे फोटो घेऊन त्यांना सोडण्याची मागणी या आंदोलनात केली जात असेल तर तो आंदोलन अपवित्रच करण्याचा प्रकार आहे असा आरोपही त्यांनी केला.