वीज गेल्याने परीक्षा रद्द : सावळा गोंधळ पुण्यासह राज्यात सुरूच
पुणे – लिपिक पदासाठी महापरीक्षा पोर्टलमार्फत घेण्यात येत असलेल्या ऑनलाइन परीक्षेचा सलग दुसऱ्या दिवशी शहरात फज्जा उडाला आहे. हिंजवडी येथील परीक्षा केंद्रात दुसऱ्या दिवशी विजेची व्यवस्था नसल्याच्या कारणावरून ऐनवेळी मंगळवारी होणारी परीक्षा रद्द करावी लागली. त्यामुळे महापरीक्षा पोर्टलचा सावळा गोंधळ पुण्यासह राज्यात सुरूच आहे.
राज्य सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत विविध पदभरतीसाठी महापरीक्षा पोर्टल विकसित केली. या पोर्टलद्वारे अर्ज केलेल्या उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा घेतली जाते. सध्या राज्यभरात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामध्ये कनिष्ठ लिपिक संवर्गासाठी परीक्षा घेण्यात येत आहे. त्यासाठी हजारो उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यानुसार त्यांची परीक्षा घेण्यात येत आहे. एकूण 266 पदांसाठी घेण्यात येत असलेल्या परीक्षेत उमेदवारांना महापरीक्षा पोर्टलचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
उमेदवारांनी हिंजवडी येथील अलॉर्ड इन्स्टिट्यूटमध्ये मंगळवारी परीक्षा केंद्रात पोहोचले. उमेदवार परीक्षा केंद्र परिसरात वेळेत पोहोचूनही त्यांच्या कागदपत्राची पडताळणी अचानक बंद केली. तसेच, 10 वाजता परीक्षेला सुरुवात झाली. 10 मिनिटांनी सोमवारप्रमाणे वीज गेली. त्यामुळे उमेदवारांचा संताप अनावर झाला. या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेत महापरीक्षा पोर्टल बंद करण्याची मागणी केली. त्यामुळे या परीक्षा केंद्रात तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर पोलिसांना बोलवावे लागले. या सर्व पार्श्वभूमीवर मंगळवारची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सर्व परीक्षांमध्ये खूप अनागोंदी कारभार
महापरीक्षा पोर्टल माध्यमातून आतापर्यंत झालेल्या सर्व परीक्षांमध्ये खूप अनागोंदी कारभार होत आहे. असा आरोप करत महापरीक्षा पोर्टल बंद करण्याच्या मागण्यांसाठी मंगळवारी आम आदमी पार्टीच्या युवा आघाडीने लाल बहादूर शास्त्री रोड येथे निदर्शने केली. या आंदोलनात स्पर्धा परीक्षांचे अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी पुणे शहराध्यक्ष मुकुंद किर्दत, युवा आघाडी राज्य सहसंयोजक संदीप सोनवणे यासोबतच बजरंग लायगुडे, प्रवीण बहिर, प्रणित तावरे, योगेश इंगळे, जितेंद्र पोळ,राज अहिवळे, नाझीम मुलानी, निखिल देवकर, मनेश जगताप आदी उपस्थित होते.
महापरीक्षा पोर्टल “घोटाळा’ व्यापमंपेक्षाही मोठा
गेल्या तीन वर्षांमध्ये या पोर्टलअंतर्गत होणारी प्रत्येक परीक्षा वादग्रस्त आणि खूप सारे प्रश्न निर्माण करणारी ठरली आहे. पारदर्शकतेच्या नावाखाली खुप मोठा आर्थिक गैरव्यवहार असल्याच्या अनेक घटना याआधी समोर आलेल्या आहेत. पुण्यातही महापोर्टल केंद्रावर मोठा सावळा गोंधळ झाला असून सर्व्हर बंद व इतर तांत्रिक अडचणीने परीक्षा बंद पडली. फडणवीस सरकारच्या काळात सुरू केलेले हे पोर्टल मध्य प्रदेश राज्यातील व्यापमं घोटाळ्यापेक्षाही मोठा असल्याची शक्यता वर्तविले जात आहे. त्यामुळे महापरीक्षा पोर्टल बंद करावी, अशी मागणी स्वामिभानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केली. यावेळी स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अमोल हिप्परगे, राज्य प्रवक्ते अनिल पवार, स्वप्निल कनवाडे, प्रेमानंद नरुटे आणि नगरसेवक शैलेश चौगुले उपस्थित होते.
हिंजवडी येथील परीक्षा केंद्रात परीक्षा सुरू असताना 10 मिनिटांनी वीज गेली. त्यानंतर वेळ वाढवून देण्यात येणार असल्याचे सांगितले. पण काहीच व्यवस्था नव्हती. सोमवारीही असाच प्रकार घडला. ही सर्व बाब महापरीक्षा पोर्टलकडे निदर्शनास आणून दिल्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले. यामुळे मनस्ताप सहन करावा लागला.
– बालाजी कदम, उमेदवार