– रमेश जाधव
रांजणी – ग्रामीण भागात गाडगी, मडकी, रांजण, चुली बनवणाऱ्या कुंभार समाजाचा पारंपरिक व्यवसाय अलीकडे त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या वाढत्या किमतीमुळे अडचणीच्या घेऱ्यात सापडला आहे. या व्यवसायासाठी लागणारी मजुरी, घटत चाललेला मजूर वर्ग आणि एकंदरीत मेहनतीचा विचार केल्यास या व्यवसायातून पोट भरणं अवघड होत आहे, त्यामुळे नवीन पिढीने या व्यवसायाकडे पाठ फिरवली आहे.
उन्हाळ्यात आपल्याकडे कुंभार बनवत असलेल्या माठ किंवा रांजणांचा आतील थर जाड असल्यामुळे त्यामध्ये पाणी थंड करण्याची क्षमता जास्त असते. असे माठ बनवणे, सुकवणे, भाजणे किंवा मजुरीचा विचार करता त्याची विक्री किंमत ही सध्या राजस्थान किंवा इतर ठिकाणावरून आलेल्या माठांपेक्षा जास्त असते,
सध्या एका लहान माठाची किंमत स्थानिक पातळीवर 100 ते 150 रुपये आहे. आकारानुसार या किमतीत वाढ होत आहे. त्यामुळे कुंभार समाजाला या पारंपरिक व्यवसायावर गुजराण करणे अवघड जात असल्याने अनेक कुंभार लोकांनी मोलमजुरी किंवा इतर व्यवसायाकडे
वळले आहेत.
वीट व्यवसायातही अडचणी
वीटभट्टी व्यवसायाकरिता मोठ्या प्रमाणात भांडवल लागते. यासाठी लागणारा कच्चा माल, माती, कोळसा चंद्रपूर किंवा इतर जिल्ह्यातून आणला जातो. त्याचा वाहतूक खर्च, मजुरी याचा विचार केल्यास आठ ते दहा वर्षांपूर्वी एक हजार विटांसाठी आठशे ते दोन हजार रुपये किंमत होती; परंतु 2022 मध्ये एक हजार विटांसाठी 7 ते 13 हजारापर्यंत विक्री किंमत झाली आहे. कच्चामाल, माती, वाहतूक खर्च, डिझेल, कोळसा शिवाय नेहमीच मजुरांची टंचाई हे सर्व लक्षात घेता या व्यवसायातील अडचणीही लक्षात येतात.
राजस्थानी माठांना पसंती वाढली
हल्ली राजस्थानमधून रंगीबेरंगी माठ विक्रीसाठी येत आहेत. त्यासाठी लागणारा कच्चा माल हा कमी दर्जाचा असून त्याच्या आतील थर पातळ असतो, त्यामुळे त्यात पाणी अधिक थंड होत नाही; परंतु त्याची किंमत स्वस्त असल्यामुळे त्याला जास्त प्रमाणात मागणी आहे.
गाडगे, मडके आणि चुली यांना पहिल्यासारखी मागणी नाही आणि मेहनतीचा विचार केल्यास कमी भावात विकायला परवडत नाही, त्यामुळे घर चालवणे अवघड झाले आहे. आता दुसरा पर्याय शोधण्याची गरज वाटू लागली आहे.
– गणपत उकिर्डे, कुंभार व्यवसायिक, रांजणी
बांधकाम क्षेत्रात तेजी आहे; विटांना भरपूर मागणी आहे; परंतु कच्चा माल ,मजुरी आणि भांडवल यांचा विचार केल्यास तारेवरची कसरत करावी लागत आहे.
– विठ्ठल चव्हाण, वीटभट्टी मालक, वाळुंजवाडी