युर्वेदात पंचकर्म ही अर्धी चिकित्सा मानली गेली आहे. पंचकर्म म्हणजे पाच कर्मे हे तर उघड आहे. पण या पाच कर्माच्या आधी आणि नंतरही काही टप्पे असतात. मुख्य कर्मात काही उपकर्मे असतात. शिवाय पंचकर्म करून घेणाऱ्याला यातील पाचही कर्मे करून घ्यावी लागतात, असे मुळीच नाही. रुग्णाची प्रकृती बघून त्याला कोणत्या कर्माची गरज भासेल हे ठरवले जाते.
वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण या पाच क्रिया ज्या चिकित्सेत आहेत ती चिकित्सा पंचकर्म चिकित्सा होय. आयुर्वेदामध्ये पंचकर्म आणि त्याची उपयोगिता जनमानसात पोहोचविणे गरजेचे आहे. आयुर्वेदाचे प्रयोजन आहे की, स्वस्थ मनुष्याच्या स्वास्थ्याचे रक्षण करणे आणि रोगी (आतुर) व्यक्तींना रोगांपासून दूर ठेवणे.
आपल्या शरीरातील न पचलेले, नको असलेले, गरजेपेक्षा जास्त असलेले शरीर घटक व विषार शरीरामधून बाहेर काढण्यासाठी उपचार पद्धत म्हणजे पंचकर्म.
शमनामुळे दोषांना साम्यावस्था प्राप्त होते हे खरे, पण थोडेसे जरी कारण मिळाले तरी दोष हे पुन्हा प्रकुपित होण्याची शक्यता असते. याउलट जेव्हा शोधनोपचार केले जातात, तेव्हा दोष शरीराबाहेर काढून टाकले जात असल्याने पुनःपुन्हा दोषप्रकोप होऊ शकत नाही व म्हणूनच शोधनोपचार हे शमनोपचारापेक्षा श्रेष्ठ आहेत.
पंचकर्मांचे सविस्तर वर्णन खालीलप्रमाणे-
1) पंचकर्मामध्ये पाच मुख्य कर्मे केली जातात. ती पुढीलप्रमाणे-वमन, विरेचन, बस्ति, शिरोविरेचन (नस्य) रक्तमोक्षण.
2) विरेचन- शरीरामध्ये वाढलेल्या पित्तदोषाला औषधी द्रव्यांच्या सहाय्याने जुलाबावाटे शरीराबाहेर टाकणे. उदा. रक्तविकार, आम्लपित्त, पांडुरोग, लठ्ठपणा.
3) बस्ति- यामध्ये औषधी तेलं, काढे, रस, मांस रस, अशी द्रव्ये गुदमार्गाद्वारे, मूत्रमार्गाद्वारे/गर्भाशयाच्या मुखाद्वारे शरीरात दिली जातात. उदा.- संधिगत वात.
4) शिरोविरेचन (नस्य) – औषधी द्रव्यांनी सिद्ध केलेली तेले, तूप हे थेंबाच्या स्वरूपात नाकात सोडले जाते. उदा.- अर्धशिशी, खांदा जखडणो, मानेच्या तक्रारी, जुनाट सर्दी.
5) रक्तमोक्षण- शरीरातील दूषित रक्त शिरांमधून सुईच्या सहाय्याने, अथवा शरीरावर जळवा लावून योग्य प्रमाणात शरीराबाहेर काढले जाते. उदा.ः जुनाट त्वचाविकार.