सामान्य कुटुंबातील अक्षय ढाकणे याची तहसीलदारपदी निवड
चऱ्होली – राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये भोसरी येथील अक्षय अशोक ढाकणे याची तहसीलदार पदी निवड झाली. शालेय जीवनात नेहमी “टॉपर’ राहिलेल्या अक्षयची एमपीएसस्सी परीक्षेतील भरारी वाखाणण्याजोगी ठरली.
अत्यंत सामान्य कुटुंबात वाढलेल्या अक्षयने जिद्दीने आणि मेहनतीने यश साध्य केले. अक्षयचे वडील एका छोट्या कंपनीमध्ये कामगार म्हणून काम करतात, तर आई गृहिणी आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण भोसरी येथील महात्मा फुले विद्यालयात झाले. 2003 साली या विद्यालयात इयत्ता चौथीच्या वर्गातील शिष्यवृत्ती परीक्षेत अक्षय 300 पैकी 294 गुण मिळवून राज्य गुणवत्ता यादीत झळकला. तर सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत अकरावे स्थान पटकावले.
प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयातून त्याने माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. एनटीएस परीक्षेत राष्ट्रीय गुणवत्ता यादीत त्याने स्थान पटकावत शिष्यवृत्ती प्राप्त केली. दहावी बोर्डाच्या परीक्षेत मागास विद्यार्थ्यांमधून अक्षयने पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळवला. अभियांत्रिकी शिक्षण “सीओईपी’मधून पूर्ण करताना इलेक्ट्रिकल या शाखेतून अव्वल स्थान गाठत सुवर्णपदक प्राप्त केले.
अक्षयचा शैक्षणिक आलेख सतत उंचावत राहिला. तर काही वेळा त्याने अपयशही पचवलय. घरच्या प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे वडिलांचा आर्थिक भार हलका करण्यासाठी त्याने पदवीचे शिक्षण घेत असताना विविध क्लासेसचे अकरावी आणि बारावीचे सराव पेपर तपासण्याचे कामही केले.
अभियांत्रिकीची पदवी घेत असताना कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये त्याची एका मल्टिनॅशनल कंपनीत नोकरीसाठी निवड झाली. पदवी मिळविल्यानंतर त्याने नोकरी जॉईन केली; परंतु प्रथमपासूनच त्याला प्रशासकीय सेवेतील नोकरी खुणावत होती.
गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून अक्षयने पूर्णवेळ राज्य/केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास सुरू केला. आणि दुसऱ्याच प्रयत्नात एमपीएससीमध्ये यश संपादन केले. अक्षयचा प्रवास इथेच थांबत नाही. त्याची केंद्रीय प्रशासकीय सेवेत जाण्याची इच्छा आहे. त्यासाठी अविरत अभ्यास करणे त्याने सुरू ठेवलय.
अक्षयला घडवत असताना त्यांच्या आई-वडिलांनी अतोनात कष्ट घेतले. मुलगी डॉक्टर (डेंटिस्ट), तर मुलगा इंजिनिअर करताना त्यांना अनेक लोकांची मदत झाली. कंपनीत काम करताना एलआयसी विमा पॉलिसी प्रतिनिधी म्हणून काम देखील केले. समाजातील राजकीय व्यक्ती, नेते, त्याचे शिक्षक यांनी त्याला सर्व प्रकारे सहकार्य आणि मदत केले. आपल्या मुलाला त्यांनी प्रशासकीय अधिकारी करण्याचे स्वप्न पाहिले आणि ते सत्यात उतरवले. अर्थात या सर्वात अक्षयची जिद्द, मेहनत आणि कष्ट करायची तयारी यामुळे हे साध्य झाले. प्रशासकीय सेवेचे स्वप्न उराशी बाळगून आज सामान्य कुटुंबातील हजारो मुले दिवस-रात्र अभ्यास करीत आहेत. या सर्वांना अक्षयचा प्रवास मार्गदर्शक ठरेल. अक्षय आपल्या या यशाचे श्रेय त्याच्या आई-वडिलांना, सर्व शिक्षकांना, मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना देतो.
प्रशासकीय सेवेत अधिकारी म्हणून काम करताना गोरगरीब जनतेपर्यंत सरकारी योजना पोहोचवणे व त्याची अंमलबजावणी करणे याशिवाय सामान्य माणसाच्या जीवनात बदल घडेल, असे निर्णय घेणे हे त्याचे उद्दिष्ट आहे, हे सांगायला अक्षय विसरला नाही.