मुंबई – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे अखेर राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. आज ( दि . २३ ऑक्टोबर ) दुपारी २ वाजता त्यांचा पक्षात प्रवेश होईल, अशी घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. यामुळे भाजपाला मोठा हादरा बसला आहे.
याबाबत केंद्रीयमंत्री व भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खडसेंनी घेतलेला निर्णय यावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सल्ला दिला आहे.
वृत्त माध्यमांशी बोलतांना रावसाहेब दानवे म्हणाले,’नाथाभाऊ जर तिथे गेले तर त्यांचा उपयोग अशा कामासाठी न करता, ते ज्येष्ठ आणि अभ्यासू कार्यकर्ते आहेत. त्यांचा उपयोग या राज्याच्या भल्यासाठी करावा. नाथाभाऊंचा उपयोग विरोधकांवर तोफ डागण्यासाठी करुन घेऊ नये. त्यांचा उपयोग भल्यासाठी करुन घ्यावा,” असे रावसाहेब दानवे म्हणाले.
तत्पूर्वी, ‘भाजपा पेक्षा हा त्यांच्यासाठी दुर्देवी निर्णय आहे. कारण, भाजपामध्येच त्यांची राजकीय जडणघडण झाली. बाजार समितीपासून ते विधानसभेतील विरोधी पक्षनेते, एकेकाळी या राज्याच्या अर्ध्या मंत्रिमंडळाचे ते प्रमुख होते. परंतु, काही कारणास्तव जसं की सर्वांना माहिती आहे की, राजकीय मुख्य प्रवाहातून ते थोडं बाजूला गेले होते. परंतु, याचा अर्थ असा नव्हता की त्यांनी पक्ष सोडयला पाहिजे होतं मात्र त्यांच्याविषयी आदर आहेत. त्यांनी दिल्या घरी सुखी राहावे. त्यांना आम्ही वेगळं समजत नव्हतो..’ असं म्हणत दानवे यांनी प्रतिक्रिया दिली होती.