मुख्यमंत्र्यानी माफी मागण्याचीही केली मागणी
कोलकाता – पश्चिम बंगाल मधील कनिष्ट डॉक्टरांचे आंदोलन आज पाचव्या दिवशीही सुरूच राहिले आहे. आंदोलनकर्त्या डॉक्टरांशी चर्चा करण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी दर्शवली होती पण संपकरी डॉक्टरांनी ममता बॅनर्जी किंवा त्यांच्या सरकारशी चर्चा करण्यास नकार दिला आहे. त्यांनी राज्य सरकारकडे सहा प्रमुख मागण्या केल्या असून त्यात मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. डॉक्टरांचा संप मोडून काढण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे असा डॉक्टरांचा आरोप आहे.
या संपाविषयी मुख्यमंत्र्यांनी आधी जी विधाने केली त्याबद्दल त्यांनी माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. ममता बॅनर्जी यांनी काल आणि आजही आंदोलनकर्त्या डॉक्टरांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी निमंत्रण दिले होते. पण त्यांनी ते धुडकाऊन लावले. मुख्यमंत्र्यांनीच एनआरएस कॉलेज आणि हॉस्पीटल येथे येऊन आंदोलन कर्त्या डॉक्टरांची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे. संपकरी डॉक्टरांनी शुक्रवारी दुपारी दोन वाजेपर्यंत कामावर रूजू व्हावे अशी सुचना सरकारतर्फे करण्यात आली होती. पण डॉक्टरांनी ती धुडकाऊन लावली.
दरम्यान 300 कनिष्ट डॉक्टरांनी आपल्या सरकारी सेवेचे राजीनामा दिला आहे. त्यामुळे हे आंदोलन आणखी चिघळले असून त्याचे पडसाद देशाच्या अन्य भागातही पसरले आहेत.