नवी दिल्ली – दक्षिण भारत आणि ईशान्य भारतात काही दिवसांपासून नैऋत्य मोसमी वारे रेंगाळल्यानंतर अखेर संपूर्ण देशातून मान्सून परतला आहे, अशी माहिती भारतीय हवामान शास्र विभागाने दिली आहे. यासंदर्भात हवामान खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत माहिती दिली.
या ट्विटमध्ये होसाळीकर यांनी म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच मान्सून इतके दिवस देशात सक्रिय राहिला आहे. आज 25 ऑक्टोबर रोजी संपूर्ण देशातून मान्सून परतला असल्याची अधिकृत माहिती त्यांनी दिली.
वायव्य भारतातून सुरू झालेल्या पावसाने 6 ऑक्टोबरपासून राज्यात थैमान घातले होते. विदर्भ, मराठवाडा, मध्य आणि उत्तर महाराष्ट्राला परतीच्या पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. यामुळे अकोला, नाशिक परिसरात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.
दुसरीकडे, दोन आठवड्यांपासून राज्यात कोरड्या हवामानाची नोंद करण्यात आली आहे. तसेच पुढील पाचही दिवस राज्यात कोरडे हवामान राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात मात्र अनेक ठिकाणी ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे.
तसेच जिल्ह्यात तापमानाचा पारा देखील घसरला आहे. रविवारी शहरात 16.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर लोहगाव येथे 17.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे.