पुणे – भाजी विक्यांनीच रस्तोरस्ती मंडई केल्याचा प्रकार अजूनही सगळीकडे दिसत आहे. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाला त्यांना हुसकावून लावताना नाकीनऊ आले आहेत.
लॉकडाऊननंतर जीवनावश्यक वस्तू मिळवण्यासाठी नागरिकांची धावपळ उडाली आहे. त्यातून भाजी घेण्यासाठी तर रांगा लागत आहेत. म्हणून गल्ली-बोळांत अनेकांनी भाजीचा ठेला थाटला आहे.
50-100 वेगवेगळ्या भाजीच्या पेंड्या घेऊन बसायचे आणि प्रत्येकी सुमारे 30 रुपयांनी ती विकायची. महापालिकेचे अतिक्रमण नियंत्रण पथक कारवाईला आले की, तो भाजीचा ढीग सहज उचलून मागे नेता येईल अशी सोय करायची. गेल्या अडीच महिन्यापासून त्यांचा हा प्रकार सुरू झाला आहे.
यामध्ये केवळ भाजीच नव्हे तर कांदे, बटाटा, भेंडी आणि अन्य फळभाज्याही अनेकांनी विकायला सुरूवात केली आहे. याशिवाय काहीजणांनी कलिंगड, आंबे, द्राक्षे, टरबूज अशाही फळांची पथारी पसरली आहे. महापालिकेचे लोक कारवाईला येण्याआधी ते विकून मोकळे होत आहेत.
जीवनावश्यक वस्तूंच्या गाड्यांच्या वाहतुकीला परवानगी असल्याने शेतातील माल ट्रक, टेम्पोने हाय-वेवर येतो. तेथून छोटे व्यावसायिक तो माल खरेदी करून छोट्या टेम्पोमध्ये शहरात आणतात. तेथून हा माल किरकोळ विक्रेते खरेदी करतात आणि रस्त्यांवर विकतात असा प्रकार सुरू आहे.