पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महापालिकेकडून विश्रांतवाडी परिसरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी मुकुंदराव आंबेडकर चौकात उड्डाणपूल तसेच ग्रेड सेपरेटर उभारण्याच्या कामाचे घाईगडबडीत भूमीपुजन करण्यात आले. मात्र, या कामात धानोरीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी सुविधाच देण्यात आलेली नाही.
भविष्यात विद्यापीठ चौकाप्रमाणेच हा पूलही पाडण्याची स्थिती उद्भवू शकते. ही बाब लक्षात घेऊन धानोरीकडे जाण्यासाठी रस्त्याची उपाय योजना करावी, अशी मागणी स्थानिक नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
याबाबतचे पत्र माजी नगरसेवक बाॅबी उर्फ अनिल टिंगरे, माजी उपमहापौर डाॅ. सिद्धार्थ गोळे, भाजप प्रवक्ते मंगेश गोळे, माजी नगरसेविका ऐश्वर्या जाधव यांनी आयुक्तांना दिले आहे. तसेच, याबाबत कार्यवाहीच होत नसल्याने या नगरसेवकांनी नाराजीही व्यक्त केली आहे.
धानोरीकडे जाण्यासाठी रस्ताच नाही…
विश्रांतवाडी चौकात साठे बिस्कीटकडून सर्वाधिक वाहने आळंदी रस्त्याकडे जातात. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची वाहने धानोरी-लोहगाव-चऱ्होलीकडे जातात. गेल्या दशकभरात या भागात नागरीकरण वाढले आहे, तर जाण्यासाठी एकच रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावर सकाळी, संध्याकाळ अगदी रात्री उशीरापर्यंत वाहतूक कोंडी असते.
त्यामुळे, या चौकात उड्डाणपूल अथवा भुयारी मार्ग उभारताना स्वतंत्र मार्ग देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, पालिकेकडून केवळ आळंदी रस्त्यासाठी ग्रेड सेपरेटर उभारण्यात आला. विमानतळाकडून आळंदीकडे जाणाऱ्या मार्गावर उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. त्यामुळे धानोरीकडे जाणारी तसेच त्या रस्त्याने येणाऱ्या वाहनांची कोंडी कायम राहणार आहे.
मेट्रोचा पर्याय नाही…
पूलाचा आराखडा तयार करताना निओ मेट्रो अथवा मेट्रोच्या आखणी नुसारच ग्रेड सेपरेटर व उड्डाणपूल उभारण्यात येत असल्याचे महापालिकेने सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात आता राज्यशासनाने निओ मेट्रो करणार नाही तर महामेट्रोनेही कोणतीही आराखडा केला नसल्याचे लेखी दिले आहे. त्यामुळे भविष्यात विश्रांतवाडी चौकात मेट्रो मार्ग करायचा झाल्यास त्यासाठी जागाच नाही. आळंदी मार्गावर मेट्रो प्रस्तावित आहे. मात्र, आता दुहेरी वाहतुकीचा भुयारी मार्ग झाल्यास मेट्रोसाठी पूल तोडावा लागण्याची भिती डाॅ. सिध्दार्थ धेंडे यांनी व्यक्त केली आहे