नवी दिल्ली – पाकिस्तानच्या हद्दीत 124 किमी आत बुधवारी पडलेले क्षेपणास्त्र हा अपघात होता असे स्पष्ट करून भारताने त्याबद्दल खेद व्यक्त केला. या प्रकाराच्या उच्च स्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी एक निवेदन जारी केले. नियमित देखभालीचे काम सुरू असताना तांत्रिक चुकीमुळे क्षेपणास्त्र उडाले. या घटनेची भारत सरकारने गांभीर्याने दखल घेतली असून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत, असे त्यात नमूद केले आहे.
हे क्षेपणास्त्र पाकिस्तानाच्या हद्दीत पडल्याचे समजते. ही अत्यंत खेदजनक घटना आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही ही त्यातल्या त्यात दिलासा देणारी बाब आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. भारतीय राजदुताला शक्रवारी पाचारण करून पाकिस्तानने शुक्रवारी समज दिली. या प्रकराची पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली. भारतीय हद्दीतून एक “सुपरसॉनिक फ्लाइंग ऑब्जेक्ट’ नऊ मार्चला सायंकाळी सहा वाजून 43 मिनिटांनी आल्याचे त्या समन्समध्ये नमूद करण्यात आले होते.
या घटनेने केवळ नागरी मालमत्तेचे नुकसान झाले असे नव्हे तर त्यात जीवित हानी होण्याचा धोका होता, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. या प्रकरणाचा पाकिस्तान तीव्र निषेध करत आहे. तो भारत सरकारला कळवावा, असे राजदुतांना सांगण्यात आले. पाकिस्तानी हवाई हद्दीचे हे उल्लंघन असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले होते. भारतीय तपासात जे निष्पन्न होईल ते पाकिस्तानला कळवावे, असेही नमूद केले आहे.
या निष्काळजीपणाची किंमत मोजायला लागू शकते, याकडे लक्ष वेधून असे प्रकार भविष्यात घडू नये म्हणून परिणामकारक उपाययोजना करण्याचा सल्ला देण्यात आला असल्याचे पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदानात म्हटले असल्याचे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे.
पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल बाबर इफ्तिकार यांनी काल सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भारताने याचे प्रत्यूत्तर दिले आहे. पाकिस्तानी हद्दीत 124 किमी आत असणाऱ्या खानेवाल जिल्ह्यातील मिया चन्नू गावात पडले. सुमारे 40 हजार फुटांवरून आलेले या क्षेपणास्त्राने भारत आणि पाकिस्तानी हवाई हद्दीत असणाऱ्या प्रवासी विमानांना धोका होऊ शकला असता. त्यात मालमत्तेची हानी झाल्याचे त्यांनी म्हटले होते.
यात जीवितहानी झाली नाही. पण ते पडले त्या ठिकाणी भींतीचे नुकसान झाले. मात्र भारतीय आणि पाकिस्तानी लष्करी कार्य महासंचालकांमध्ये त्याबाबत चर्चा झाली नाही. या क्षेपणास्त्राचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा अडीच ते तीन पट होता. सीरसा येथून ते उडाले. सुरवातीला ते भारतातील महाजन फिल्ड फायरिंग बेसकडे जात होते मात्र 70 ते 80 किमी गेल्यानंतर त्याने आपली दिशा बदलली आणि पाकिस्तानी हद्दीत गेले.