“अँग्री यंग मॅन’ अमिताभ बच्चन यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला. तमाम बच्चनप्रेमींच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्यांच्या अदाकारीने भारतीय मनावर अधिराज्य गाजवले. अजूनही त्यांच्या उत्साही वावरण्याला मनापासून दाद मिळते. अशा या युगाच्या महानायकाला हा पुरस्कार मिळणे क्रमप्राप्त होते. कारण त्यांच्या अभिनयाने केवळ आनंद दिला नाही तर अनेकांना जगण्याची उमेदही दिली. अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा नायक अनेकांच्या हृदयात स्थान मिळवून बसला. प्रस्थापितांच्या विरुद्ध बंड करणारा हा पडद्यावरील नायक प्रत्येकाच्या मनातील इच्छापूर्तीचे प्रतीक बनला. म्हणूनच त्याला मिळालेल्या सर्वोच्च पुरस्कारामुळे त्यांचे चाहते भारावून गेले आहेत.
दीवार’मधला गोदी कामगार आठवला की कुणाविरुद्ध पेटून कसे उठायचे असते ते मनात रुजून बसते. ज्याने 1970 नंतरची पाच दशके आपल्या अभिनयाच्या जोरावर अवघ्या रसिकांच्या मनावर राज्य गाजविलं. ज्याच्यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीत कोट्यवधींची उलाढाल वाढली. ज्याला या देशातील तरुण पिढी आपला आदर्श मानत होती. तरुणांच्या वागण्यात, बोलण्यात अमिताभच दिसत होता. “कुली’ चित्रपटाच्या वेळी जखमी झाल्यावर तो वाचावा, म्हणून देशभरातील मंदिर-मशिदीत लाखो मनांनी प्रार्थना केली. तोच हा गोदी कामगार म्हणजेच अमिताभ बच्चन. अमिताभ चित्रपटसृष्टीत आले त्यावेळी राजेश खन्ना यांच्यासारख्या रोमॅंटिक चेहऱ्यांच्या अभिनेत्यांचा जमाना होता. उंच, किडकिडीत बांधा, विस्कटलेले केस, रूपाची फारशी साथ नसलेले अमिताभ उद्याचा “सुपरस्टार’ असतील अशी पुसटशी शंकाही कुणाच्या मनात त्यावेळी आली नसेल.
प्रकाश मेहरा यांच्या “जंजीर’च्या इन्स्पेक्टरच्या भूमिकेसाठी त्यावेळच्या सुपर अभिनेत्यांनी नकार दिल्याने प्रकाश मेहरांनी या नवोदिताला संधी दिली. अमिताभच्या या इन्स्पेक्टरने त्यांचा स्वतःचा आणि प्रकाश मेहरांच्याही यशाचा मार्ग खुला केला. “ये पुलिस थाना है, तुुम्हारे बाप का घर नही,’ असे प्राणला ठणकावत खुर्ची लाथाडणाऱ्या अमिताभच्या डोळ्यातील अंगार रसिकांच्या मनाला भिडला. तिथेच अँग्री यंग मॅनचा जन्म झाला. नंतर यश चोप्रांच्या “दीवार’ने दोन भावांची कथा पडद्यावर आणली. “दीवार’मधील गोदी कामगाराने रसिकांच्या मनात कायमचे स्थान मिळविलेच. पण पडद्यावरील रोमॅंटिक हिरोची प्रतिमाही बदलून टाकली. हा अँग्री यंग मॅन रसिकांना अधिकच भावत गेला. प्रत्येक चित्रपटात तो अधिक ठसत गेला. शोषित वर्गाला न्याय मिळवून देणारा, सत्यासाठी संघर्ष करणारा, प्रेमासाठी त्याग करणारा अशा आगळ्यावेगळ्या नायकांनी हिंदी चित्रसृष्टी गजबजून गेली.
सुंदर चेहऱ्याचा नायिकेबरोबर बागेतून उड्या मारीत गाणे म्हणणारा रोमॅंटिक हिरो लोकांना आवडेनासा झाला. डोळ्यात अंगार घेऊन खलनायकी प्रवृत्तीचा नाश करणारा नायक अमिताभनी पडद्यावर जिवंत केला आणि अनेकांच्या मनातील भावना त्याच्याशी जणू समरसच झाल्या. आपल्याला जे करता येत नाही ते अमिताभकडून पडद्यावर घडू लागल्याने प्रत्येक जण मनोमनी सुखावू लागला.
‘जंजीर’मधल्या इन्स्पेक्टरनंतर ‘दीवार’मधील गोदी कामगाराने कोट्यवधी मनांना वेड लावले. मग अभिताभनी जी मुसंडी मारली ती थेट जगातील सर्वोच्च स्थानावर. भारतीयच नव्हे तर जगभरातील रसिकांच्या मनावर अमिताभ नावाचे गारुड घर करून राहिले. त्याचे कारण होते फक्त अभिनय. अमिताभचा जिवंत अभिनय. ‘दीवार’मधील गोडाऊनमधील मारामारी म्हणजे त्वेषाने तुटून पडण्याचा जिवंत आविष्कारच. हा जिवंतपणा भावला. म्हणूनच अमिताभ या नावाभोवती चित्रपट तयार होऊ लागले. डॉन, त्रिशूल, काला पत्थर, मि. नटवरलाल, लावारिस अशा अनेक ऍक्शनपटांनी रसिक तृप्त झाले. डोळ्यात अंगार असलेल्या अमिताभच्या अँग्री यंग मॅनच्या प्रतिमेने अनेकांना झपाटलेच. पण त्याखेरीज वेगवेगळ्या भूमिकाही अमिताभनी अजरामर केल्या. ‘जुर्माना’ आणि ‘बेमिसाल’ मधला प्रेमळ अमिताभ वेगळाच होता. “याराना’, ‘नमकहलाल’ मधील नर्म विनोदी अमिताभही चाहत्यांना भावून गेला. ‘मुकद्दर’मधील सिकंदर असो की, “बेनाम’मधील मौसमीचा भांबावलेला पती किंवा ‘मजबूर’मध्ये कुटुंबासाठी त्याग करणारा नायक असो की ‘काला पत्थर’मध्ये राखीशी उर्मट वागणाऱ्या शत्रुघ्नला नमविण्यासाठी पळत येऊन मारलेली लाथ असो. ‘शराबी’ मध्ये तर जगण्यातील प्रत्येक भावनेचा आविष्कार त्यांनी व्यक्त केला आहे. अमिताभ सर्वांच्या मनाचा नायकच ठरला.
समकालीन अभिनेत्यांपेक्षाही बुजुर्ग अभिनेत्यांबरोबर भूमिका निभावताना त्यांनी आपल्या अभिनयाचे कौशल्य सहज सिद्ध केले. दिलीपकुमारशी ‘शक्ती’मध्ये सामना करताना बापापेक्षा मुलगाच ठसा उमटवून गेला. ‘शोले’त धर्मेंद्रशी त्यांनी टक्कर दिली. त्यापूर्वी ‘नमक हराम’ आणि ‘आनंद’ मधून त्याने राजेश खन्ना यांच्याबरोबर काम करताना तडफ दाखवली.
“सात हिंदुस्तानी’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘बंधे हाथ’ मध्ये जीव तोडून पळणारा बच्चन पाहिल्यावरच त्याचा मनापासून मेहनत घेण्याचा गुण लक्षात येतो. जंजीर, दीवार नंतर डॉन, कभी कभी, परवरीश, अमर अकबर अँथनी, कालिया, सुहाग असे अमिताभचे एकामागोमाग एक चित्रपट येत होते. चाहते त्याच्यावर तुटून पडत होते. अमिताभच्या हसण्याने ते हसत होते. अमिताभच्या रडण्याने ते रडत होते. अमिताभने बेलबॉटम घातली की ते घालत होते. त्याने बटने न लावता शर्टाला गाठ मारली की हेपण तीच स्टाइल मारत होते. सारे काही अमिताभमय झाले होते.
कुलीच्या अपघातानंतर थोडा ब्रेक लागला. राजकारणात अपयश आले. काही सिनेमे फ्लॉप झाले. सुपरस्टार संपल्याची आवई उठली. पण नंतर पुन्हा फिनिक्सप्रमाणे हा महानायक उभा राहिला. अनेकांना उभे केले. “कौन बनेगा करोडपती’द्वारे छोट्या पडद्यावरून तो घराघरांत भरून राहिला. चिनी कम, बागबान, पा, पिंक आणि अगदी अलीकडे आलेला बदला अशा चित्रपटांतूनही त्यांच्या दैवी देणगीचे अभिनयाचे दर्शन त्यांनी दिले. या महान महानायकाच्या रूपात प्रत्येकाने स्वप्ने पाहिली, जगली, हेच या सुपरस्टारचे मोठे देणे. अनेक फॅन्सच्या जीवनात त्यांनी भरलेले रंग कायम आयुष्य मोहरून टाकत राहील.
श्रीकांत कात्रे